पत्रकार परिषदेत आमदारांनी मानले सर्वांचे आभार
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी
स्व.के.एम बापूंच्या नंतर पाचोरा मतदार संघाला मंत्री पदाची संधी मिळालेली नाही ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्याचे नेतृत्व करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास मी सक्षमपणे काम करेल, असे सूतोवाच आ. किशोर आप्पा पाटील यांनी केले. ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नवीन कार्यालयात दुपारी साडे तीन वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मतदारसंघातील शेतकरी, जनता, महायुती घटक पक्षांचे पदाधिकारी, शिवसैनिक, हितचिंतक, कार्यकर्ते यांनी मला निवडून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आमदारांनी सर्वांचे आभार मानले आहेत. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, भाजपा समन्वयक सुनील पाटील, नंदू सोमवंशी, स्वीय सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.
मला मतदारसंघ विकासाच्या माध्यमातून एक वेगळ्या उंचीवर घेवून जायचा आहे. बेरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांच्या वीज, पाणी समस्या कायमच्या मार्गी लावायच्या आहे. असे अनेक प्रश्नांवर आगामी पाच वर्षांच्या काळात काम करणार असल्याचेही आ.किशोर पाटील म्हणाले.