मंत्री गिरीश महाजन श्रीनगरकडे रवाना
जळगाव (प्रतिनिधी)-
जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांना समावेश आहे. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आणि जम्मू-काश्मिरात अडकलेल्या इतर पर्यटकांच्या सुटकेसाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगरहून मुंबईला एअर इंडियाच्या विमानाने आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी १२.१५ वाजता निघाले आहे. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव घेऊन येणारे विमान सायंकाळी ६ वाजता निघेल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी १.१५ वाजता श्रीनगर येथून विमान निघाले आहे.
मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे.