बॅनर-झेंड्यांवरही कडक नियम जळगावात आंबेडकर जयंतीनिमित्त प्रशासन सक्रिय
साईमत जळगाव प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १४ एप्रिल २०२६ रोजी जळगाव शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाचे निर्बंध लागू केले आहेत. या निर्णयामुळे शहरातील डेली बाजार तसेच काही भागांतील साप्ताहिक आठवडे बाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत.
महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील प्रमुख रस्त्यांवरील डेली बाजार आणि हरी विठ्ठल नगर तसेच खंडेराव नगर परिसरातील आठवडे बाजार मिरवणुकीच्या दिवशी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश उपायुक्त पंकज गोसावी यांनी जारी केला आहे. मिरवणुकीदरम्यान नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक सुरळीत राहणे आणि आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील सर्व भाजीपाला विक्रेते, फेरीवाले आणि हॉकर्स यांनी मिरवणुकीच्या मार्गांवर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मिरवणुकीचे मार्ग मोकळे ठेवून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, जयंतीनिमित्त शहरात लावण्यात येणाऱ्या बॅनर्स आणि झेंड्यांबाबतही मनपाने कठोर नियमावली जाहीर केली आहे. कोणतेही बॅनर किंवा झेंडे लावण्यासाठी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले असून, ते फक्त निश्चित केलेल्या जागांवरच लावता येणार आहेत. विशेषतः विद्युत खांब किंवा दूरध्वनी लाईनवर बॅनर लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे नागरिक, सामाजिक संघटना आणि व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. शहरात शांतता, शिस्त आणि मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.
