महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेची 21 मे रोजी राज्यव्यापी बंदची हाक
मुंबई (प्रतिनिधी)-
महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेने 21 मे रोजी राज्यव्यापी बंदची हाक देत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ई- बाईक टॅक्सीला या संघटनेने विरोध दर्शवला असून याविरोधात राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर 21 मे रोजी आंदोलन करणार आहे. ई-बाईक टॅक्सीमुळे 15 लाख रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
राज्य शासनाने ई-बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी रद्द करावी. यासाठी 21 मे रोजी ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती सर्व संलग्न संघटनांद्वारे महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने केली जातील.
बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ई-बाईक टॅक्सी आणावी किंवा नाही यासाठी राज्य शासनाकडून नेमलेल्या समितीसमोर संघटनेमार्फत ई-बाईक टॅक्स टॅक्सीला विरोध करण्यात आला, त्याचे कारणही समितीसमोर मांडण्यात आले. राज्य शासनाने एकतर्फी निर्णय घेत ई-बाईक टॅक्सीला परवानगी दिली.
मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील ऑटोरिक्षा संघटनांच्या प्रमुखांची बैठक 27 एप्रिलरोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात 21 मे रोजी आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला.