साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर
नैसर्गिक संकटांशी संघर्ष करत शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असताना लोंढ्री शिवारातील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील १ लाख १० हजार रुपये किमतीच्या ठिबक नळ्या अज्ञात चोरट्यांंनी चोरून नेल्या. याबाबत लोंढ्री येथील प्रकाश रामचंद्र गव्हाळे, विलास रामचंद्र गव्हाळे, अशोक माधवराव पांढरे यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. शेतीमालाला असलेला कवडीमोल भाव, उत्पन्नात झालेली प्रचंड घट यामुळे आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी अशा चोऱ्यांमुळे हतबल झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी शोध घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
त्यात म्हटले आहे की, आमची शेती मोतीआई मंदिराजवळ असून रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतात जमा केलेले ठिबक लंपास केल्याचे शेतात गेले असता निदर्शनास आले.
प्रकाश गव्हाळे आणि विलास गव्हाळे यांचे प्रत्येकी दोन एकर क्षेत्रातील ६० हजार रुपये किंमतीचे ठिबक तसेच अशोक पांढरे यांच्या चार एकर क्षेत्रातील सुमारे ६० हजार रुपये किंमतीच्या ठिबक नळ्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. याप्रकरणी चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्याकडे केली आहे. दरम्यान सहाय्यक फौजदार रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.