मराठी विषयाच्या चर्चासत्राप्रसंगी प्रा. एन. के. ठाकरे यांचे प्रतिपादन
साईमत/पाचोरा /प्रतिनिधी :
मानवी जीवनातले साहित्याचे स्थान अनन्यसाधारण आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये साहित्यातून प्रतिबिंबीत होता. त्या अनुषंगाने साहित्य हे मानवी जीवनात मूल्यवर्धनाचे काम करत असते. माणसाला व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्याचे बळ हीच मूल्ये आपल्याला देतात, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू प्रा. डॉ. एन. के. ठाकरे यांनी केले. येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित प्रथम वर्ष कला मराठी विषयाच्या चर्चासत्राप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ होते.
याप्रसंगी विचारधारा प्रशाळेचे संचालक व व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी बीजभाषण केले. प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. जगदीश पाटील, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. के. एन. सोनवणे उपस्थित होते. प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अतुल देशमुख यांनी केले.
चर्चासत्राच्या द्वितीय सत्रात डॉ. अक्षय घोरपडे, डॉ. संदीप माळी, डॉ. किशोर पाठक, डॉ. मधुचंद्र भुसारे यांनी निबंध वाचन केले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. फुला बागुल होते. समारोप सत्रात मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, कथाकार डॉ. संजीवकुमार सोनवणे व सुनील गायकवाड तसेच प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून डॉ. उज्ज्वला नन्नवरे, डॉ. महेंद्र सोनवणे व डॉ. सी. एस. करंके यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी कथाकार बी. एन. चौधरी, विलास मोरे, राजेंद्र पारे, डॉ. युवराज पवार उपस्थित होते. प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी आभार मानले.