साईमत, धुळे, प्रतिनिधी
देशपातळीवरील विविध राजकीय पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया गटाची दोन दिवसांपासून मुंबईत बैठक होत असतानाच स्थानिक पातळीवरही ‘इंडिया’तील घटकपक्षांची येथे बैठक झाली. आगामी निवडणुका भाजपविरोधात एकदिलाने लढवू, असा निर्धार ‘इंडिया’तील घटकपक्षांनी येथे केला.काँग्रेसच्या वरिष्ठांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांना दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी गुरुवारी (ता. १) काँग्रेस भवनात इंडिया मीट बोलावली. भाजपविरोधी पक्ष, संघटनांचे सुमारे दोनशे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित प्रतिनिधींनी भाजपच्या ध्येयधोरणांवर कडाडून टीका केली. तसेच पाच ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले.
दुष्काळासह इतर ठराव
जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, पीकविम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, मनपात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत स्वतंत्र चौकशी करावी, जिल्ह्यातील अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करून जिल्हा गुन्हेगारीमुक्त करावा, केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून राजकीय मंडळींचा भाजपमध्ये प्रवेश करून घेण्याचा निषेध, इंडिया आघाडी ठरवेल त्या उमेदवाराचा सर्वांनी एकदिलाने प्रचार करून निवडणुका जिंकणे आदी ठरावांचा यात समावेश आहे. दरम्यान, बैठकीनंतर काँग्रेस भवनासमोर आतषबाजी करत भाजपविरोधी एकजुटीचा जल्लोष करण्यात आला. श्री. सनेर, माजी आमदार वसंतराव सूर्यवंशी, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार प्रा. शरद पाटील, अतुल सोनवणे, महेश मिस्तरी, डॉ. सुशील महाजन, किरण जोंधळे, शुभांगी पाटील, कैलास पाटील, पंकज गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित भोसले, जितेंद्र मराठे, दीपक देवरे, विमल बेडसे, काँग्रेसचे डॉ. दरबारसिंग गिरासे, गुलाबराव कोतेकर, भगवान गर्दे, बाजीराव पाटील, प्रमोद सिसोदे, बापू खैरनार, गायत्री जयस्वाल, बानूबाई शिरसाट, रिपाइं गवई गटाचे प्रा. बाबा हातेकर, सपाचे अमीन पटेल, बसपचे अनिल दामोदर, वंचितचे राज चव्हाण, कॉ. एल. आर. राव, आपचे हितेंद्र पवार, शकील अहमद, डॉ. एस. टी. पाटील, सुरेश बैसाणे, अविनाश पाटील व इतर भाजपविरोधी पक्ष-संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.