शासकीय यंत्रणेचे काम शेतकऱ्यांच्या मारले जातेय माथी
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी बंधनकारक केल्यामुळे शेतकरी कामाला लागला आहेत. परंतु तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये नेटवर्क नसल्याने तसेच शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्याने ई-पीक पाहणी कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे अँड्रॉईड मोबाईलअभावी ई-पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी ‘डोकेदुखी’ ठरत आहे. तालुक्यातील सावळदबारा, सोयगाव, जरंडी, बनोटी अशा चारही महसूल मंडळात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. त्यातच काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि वादळाने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केलेल्या पिकांची पाहणी करण्याकरिता ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्वे नंबर एकूण क्षेत्र पोट खराब क्षेत्र तसेच शेतातील पिके यांची माहिती सॉफ्टवेअरमध्ये शेतकऱ्यांनी स्वतः भरून व फोटो काढून अपलोड करणे बंधनकारक केले आहे.
बहुतांश शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नाहीत. ग्रामीण भागात काही ठिकाणी दुर्गम भागात मोबाईल नेटवर्कही नाही. त्यामुळे गरजू, अशिक्षित शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी कार्यक्रम डोकेदुखी ठरत आहे. शेतकऱ्यांचे शेतीचे दस्ताऐवज कामे करण्यासाठी शासकीय स्तरावर महसूल मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक पदे नेमली आहे. त्यांचे काम शेतकऱ्यांकडून करून घेता येत सर्वच कामे ऑनलाईन केल्यामुळे शेतकऱ्यावर ताण वाढला आहे. शासन दरबारी असलेले अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतः शेतकऱ्यांची ही पीक-पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
ॲपवरील त्रुटी लवकरच दूर करावी
काही आठवड्यापासून शेतकरी शेतात जाऊन सतत पीक पाहणी ॲप घेऊन प्रयत्न करत आहेत. परंतु हे ॲप उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन ॲपवरील त्रुटी लवकरच दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.