साईमत, जळगाव, प्रतिनिधी
आजच्या काळात टेक्नॉलॉजी आत्मसात करणे अत्यावश्यक बाब बनली असून टेक्नोसेव्ही आणि टेक्नोस्नेही बनल्यास प्रशासकीय कामकाजात गती आणि सर्वांगीण प्रगती येते, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले.
विद्यापीठात कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध टेक्नोसेव्ही सुविधांचे उद्घाटन कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात कुलगुरू माहेश्वरी पुढे म्हणाले की, माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर विविध क्षेत्रात वाढत आहे. प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य आहे. तंत्रज्ञानापासून दूर न जाता तंत्रस्नेही बनल्यास आपण अधिक गती आणि प्रगती करु शकू. पतपेढीने आपल्या कामकाजात टेक्नोसेव्ही सुविधा सुरू करुन गतीमान जनसंपर्काकडे वाटचाल केल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळास व सभासदांस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्र-कुलगुरु, प्रा. एस. टी. इंगळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरक मार्गदर्शन केले. डॉ. विनोद पाटील, कुलसचिव, सीए रविंद्र पाटील, वित्त व लेखाधिकारी यांचेही समायोचित संबोधनपर भाषणे झालीत. कार्यक्रमास पतपेढीचे डॉ. महेंद्र महाजन, अध्यक्ष डॉ. सोमनाथ वडनेरे, उपाध्यक्ष अरुण सपकाळे, सचिव राजू सोनवणे, अशोक पाटील, संजय ठाकरे, श्रीमती वैशाली शर्मा, जयश्री देशमुख, डॉ.दिनेश लाड, डॉ. अनिल लोहार आदी संचालक मंडळ उपस्थित होते. तद्नंतर पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ.महेंद्र महाजन यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.