बोदवड तालुक्यात अवकाळी पावसामुळे रब्बीचे पिके भुईसपाट

0
15

साईमत, बोदवड : प्रतिनिधी

एकीकडे कडक ऊन तापत असताना अंगाची लाहीलाही होत असताना मंगळवारी, ९ एप्रिल रोजी मराठी नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी दुपारी अचानक आलेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने बोदवड तालुक्यातील अनेक गावात घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. तसेच शेतातील रब्बीचे पिके भुईसपाट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच बुधवारी, १० एप्रिल रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड.रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील वाकी, मुक्तळ, वराड, जलचक्र येथे भेट देऊन पडझड झालेल्या घरांची व शेत शिवाराची पाहणी करून तहसीलदार यांच्यासोबत संपर्क साधून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत चर्चा केली. एकीकडे नेते मंडळी लोकसभा निवडणुकीत व्यस्त असताना शेतकरी बांधवांवर आलेल्या अस्मानी संकटांमुळे शेतकरी व सामान्य नागरिक हतबल झालेले आहे. अशातच ॲड.रोहिणी खडसे यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.

बोदवड तालुक्यात अचानक आलेल्या वादळ आणि अवकाळी पावसाने अनेक घरांची पडझड झाली. घरांवरील पत्रे उडून गेली. त्यामुळे घरातील संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. दुष्काळी छायेत असताना विहिरीत असलेल्या कमी जलसाठ्याच्या सहाय्याने जिवापाड मेहनत घेऊन शेतकरी बांधवांनी घेतलेल्या रब्बीच्या गहू, हरभरा, मका, ज्वारी, केळीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके भुईसपाट झाले आहेत. काढणीवर आलेले पिके भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असुन उद्विग्न झाला आहे.

कापूस जळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ

बोदवड तालुक्यातील जलचक्र बु.येथे जि.प.प्राथमिक शाळेवरील पत्रे उडून गेल्यामुळे शैक्षणिक साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. तसेच वादळी वाऱ्यामुळे बोदवड शहरातील कृषी पुरक उद्योग असलेल्या जिनिंग व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हरणखेड येथे वीज कोसळून कापूस जळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसली आहे. अशातच ॲड.रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील वाकी, वराड, जलचक्र, मुक्तळ येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या सोबत संपर्क साधून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याबाबत चर्चा केली. तसेच जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. त्यांच्याकडे नुकसानीचे सरसकट पंचनामे करून आचारसंहिता बाजूला ठेऊन नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून देण्याची मागणी करणार असल्याचे ॲड.खडसे यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती

यावेळी माजी सभापती गणेश पाटील, किशोर गायकवाड, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवक प्रदेश चिटणीस विजय चौधरी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बोदवड शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर, जितेंद्र पाटील, अतुल पाटील, श्‍याम पाटील, अमोल पाटील, गजानन पाटील, संदीप घडेकर, अजय पाटील, बोदवड तालुका गटविकास अधिकारी निशा जाधव, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here