शेतीसह संसार उद्ध्वस्त; पावरी कुटुंबावर संकटाचा डोंगर
साईमत भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील तळवेल परिसरात रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महामार्गालगत असलेल्या पाटील वॉशिंग सेंटर परिसरात भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. या आगीत पावरी कुटुंबाचे संपूर्ण झोपडीवजा घर आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, आईच्या प्रसंगावधानामुळे दोन चिमुकल्यांचे प्राण थोडक्यात बचावले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुऱ्हानपूर येथील निलेश चव्हाण (पावरी) हे कुटुंबासह येथे शेतमजुरीसाठी वास्तव्यास होते. घटनेच्या वेळी त्यांच्या पत्नी झोपडीत दोन लहान मुलांसह—दोन वर्षांचा मुलगा आणि सहा महिन्यांची मुलगी—गाढ झोपेत होत्या. अचानक झोपडीला आग लागल्याचे लक्षात येताच, आईने क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आगीच्या दिशेने धाव घेत दोन्ही चिमुकल्यांना बाहेर काढले. या धाडसी कृतीमुळे तिघांचे प्राण वाचले, मात्र काही क्षणांतच त्यांचा संपूर्ण संसार आगीच्या भक्ष्यस्थानी गेला.
या आगीत घरातील अन्नधान्य, कपडे, भांडीकुंडी तसेच सुमारे पाच हजार रुपयांची रोकड जळून खाक झाली. याशिवाय शेतातील गुरांचा चारा, कुटार, कुट्टी तसेच ट्रॅक्टर, थ्रेशर, नांगर, टिलर यांसारखे महत्त्वाचे शेतीसाहित्यही मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले आहे. त्यामुळे पावरी कुटुंबासह परिसरातील शेतकऱ्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, शेतातील गव्हाच्या बांधांना लागलेल्या आगीने प्रथम पेट घेतला आणि वाऱ्याच्या जोरामुळे आग वेगाने पसरत शेजारील झोपडीपर्यंत पोहोचली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले.
घटनेची माहिती मिळताच वरणगाव नगरपरिषदेचा अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिक आणि नगरसेवक विनोद झोपे यांनीही शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. दीर्घ प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पावरी कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
