साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील बेलाड येथे गेल्या २६ मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे ३३ के.व्ही. बेलाड उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील गावातील व शेतीतील वीज खंडित झाली होती. त्यामध्ये प्रामुख्याने उपकेंद्रापासून ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणारे विद्युत खांबे जमीनदोस्त झाले होते. वीस ते पंचवीस दिवस उलटूनही शेतीपर्यंत वीज पोचलेले नाही. त्यामुळे शेतकरी खूप मोठा अडचणीत आलेला आहे. उपकेंद्र अभियंता यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याला खूप मोठ्या नुकसानीचा फटका बसत आहे. त्याच त्रासाला कंटाळून बुधवारी, १९ जून रोजी शेतकऱ्यांनी संभाजी शिर्के यांना सोबत घेऊन महावितरणमध्ये ठिय्या आंदोलन करुन महावितरणला टाळे ठोकले.विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी बेलाड उपकेंद्र येथे आपल्या व्यथा मांडल्या.
पेरणीच्या तोंडावर वीज महावितरणचे संथगतीने सुरु असलेल्या कामावर शेतकऱ्यांनी ताशेरे ओढत महावितरणच्या अधिकाऱ्याला धारेवर धरले. आपल्या शेतापर्यंत कधी सुरळीत वीज पोहोचेल, याची ग्वाही त्यांच्याकडून बोलून घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या सहा ते सात दिवसात सर्व शेतातील वीज सुरळीत होईल, अशी ग्वाही दिली. यामध्ये विशेष संभाजी शिर्के यांची उपस्थिती होती.
४० पैकी २५ ते ३० डीपीवरील लाईट सुरळीत सुरु होईल. तसेच अन्य लाईट चार ते पाच दिवसात सर्व व्यवस्थित होईल, अशी ग्वाही घेतल्यानंतर कुलूप उघडले. तसेच हे काम दिलेल्या निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा सज्जड इशाराही दिला. तसेच बेलाड, घिर्णी, माखणेर, बाहापुरा पान्हेरा, वाघूड आदी भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
