जळगावात ‘केळी–उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम’
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात जळगावात ‘केळी–उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम’ पार पडला. हा कार्यक्रम सहकार व पणन विभाग तसेच आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ग्रीन बिझनेस नेटवर्क प्रकल्पांतर्गत आयोजित केला होता. कार्यक्रमाचे आयोजन जळगाव कृषी व आत्मा विभाग आणि पुणे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. प्रशिक्षण कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी, महिला बचत गट, कृषी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कृषीविषयक आवड असणारे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमामुळे निर्यातक्षम केळी लागवडीसाठी शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आहे.
प्रशिक्षणाला विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ आणि अधिकारी उपस्थित होते. त्यात विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, उपसंचालक शिवपुरी पुरी (पीआययु मॅग्नेट, नाशिक), केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अरुण भोसले, जैन इरिगेशनचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. के. बी. पाटील, एक्सिम फार्मर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रवीण वानखडे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. व्ही. टी. गुजर, मॅग्नेटचे जीईएसआय अधिकारी धनराज देशेटवार, ॲग्री बिझनेस तज्ज्ञ सनी काटे आणि एमजी आणि एफआयएलचे महेश वसईकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमात केळी लागवडीच्या निर्यातक्षम तंत्रज्ञानाबाबत, उत्पादन प्रक्रियेत गुणवत्ता नियंत्रण, रोगप्रतिबंधक उपाययोजना, आंतरराष्ट्रीय मानके, निर्यातीच्या संधी, वित्तीय व्यवस्थापन आणि सामाजिक समावेशन यांसारख्या विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि प्रकल्प संचालक आत्माचे (जळगाव) कुर्बान तडवी यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना आधुनिक आणि वैज्ञानिक शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळाली. विशेषतः केळी उत्पादन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी ओळखून त्याचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागते, त्याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले.
शेतीच्या मूल्य साखळीला चालना देणारा ठरला उपक्रम
संपूर्ण कार्यक्रम शेतकरी केंद्रित होता. शेतकऱ्यांना आत्मनिर्भरतेकडे नेणारा, त्यांच्यात उद्योजकता आणि जागतिक दृष्टिकोन निर्माण करणारा होता. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी मार्गदर्शन, संशोधन, निर्यात, बाजारपेठेतील संधी तसेच डिजिटल वित्तीय व्यवस्थापनावर भर देणारा उपक्रम शेतीच्या मूल्य साखळीला चालना देणारा ठरला.