‘समाधान’ शिबिरात अनेकांचे झाले ‘असमाधान’, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीच लाभली उपस्थिती
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात महाराष्ट्र शासन महसूल, वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव १०० दिवसांचा कृती आराखड्याअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व समाधान शिबिर दोन दिवसापूर्वी आयोजित केले होते. शिबिरात विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांसह नागरिक, ग्रामस्थांना देण्यात येणार होती. तसेच जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार होते. परंतु शिबिरात नाट्यगृहात टाकलेल्या खुर्च्यांवर अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आल्याने शेतकरी शिबिरापासून वंचित राहिल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नेमके शिबिर कोणासाठी आयोजित केले होते. जनतेच्या किती समस्यांचे निराकरण केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी घेण्यात येणारे शिबिरे, कार्यक्रमासाठी प्रसार माध्यमांना प्रशासन आमंत्रित करीत नाही. त्यामुळे ‘समाधान’ शिबिरात अनेकांचे ‘असमाधान’ झाल्याचे दिसून आले. शिबिर संपल्यानंतर काही शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत ट्रॅक्टर देण्यात आले. त्यासाठी ‘फोटो काढण्यासाठी बाहेर चला’ अशी विनवणी तहसीलदार गिरीश वखारे यांनी उपस्थित पत्रकारांना केली.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील होते. तसेच प्रमुख उपस्थितांमध्ये तहसीलदार गिरीश वखारे, नायब तहसीलदार निकेतन वाळे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे, मुख्याधिकारी सुभाष जानोरे, महिला व बालविकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका सुनीता पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी युवराज आढागळे, कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतु ह्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तसेच संबंधित कार्यालयामधील संबंधित योजनांची माहिती देणारे अधिकारी, कर्मचारी टेबलवर उपस्थित नसल्याने तालुकाभरातून आलेल्या शेतकऱ्यांना त्यांची वाट पाहत शेवटी माघारी परत जावे लागत असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी कुठे गेले? याविषयी कार्यालयात विचारणा करतात.त्यांना ‘साहेब’ साईडवर गेलेले आहे, असे उत्तर मिळते. यासाठी विविध योजनांची माहिती देणारे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस शेतकऱ्यांना तसेच ग्रामस्थांना माहिती देण्यासाठी कार्यालयात हजर रहावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
बोटावर मोजण्याइतकी शेतकऱ्यांची उपस्थिती
शिबिरात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रामदास जाधव यांनी जिल्हास्तरीय योजना, ज्यात विशेष घटक योजना आहेत. त्यांची माहिती दिली. तसेच राज्य सरकार अंतर्गत असलेल्या नाविन्यपूर्ण योजना ज्यात दुधाळ गट तसेच शेतकऱ्यांनी उद्योजक व्हावे, यासाठी शेळी गट, कुक्कुट शेड, राष्ट्रीय पशुधन अभियान योजना यासारख्या विविध योजनांची विस्तृत माहिती देत शेतकऱ्यांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवाहन केले. परंतु ही माहिती ऐकण्यासाठी शिबिरात बोटावर मोजण्याइतके शेतकरी उपस्थित होते.सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांनी केले.