तूर बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्याचा संताप

0
8

साईमत, यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील कोळवद येथील शेतकऱ्याने भुसावळ येथील एका बी-बियाणे दुकानातून (शेतकऱ्याकडे बियाणे खरेदीचे बिल आहे) नावाजलेल्या कंपनीचे तूर पिकाचे बियाणे गेल्या १५ दिवसांपूर्वी खरेदी करून आपल्या शेतात तूर पेरणी केली होती. तूर पिक उगवले नसल्याने शेतकऱ्याने संताप व्यक्त केला आहे. कंपनीच्या संबंधित माणसांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केल्यावर कंपनीमार्फत शेतकऱ्याला उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यात कंपनी आणि तुम्ही एकमेकांचे काहीच करू शकणार नाही, असा सल्ला दिला. शेतकऱ्याचे झालेले आर्थिक नुकसान व पेरणीची जी वेळ वाया गेली त्याबाबत पर्यायी व्यवस्था न केल्याने याबाबत आता तालुका कृषी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी काय कारवाई करणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

कोळवद येथील वैभव राणे यांनी म्हणाले की, शेत गट नंबर ४२२/ १, ५३९/१, व ५४० मध्ये तूर पेरणी करण्यासाठी २७ मे २०२४ रोजी भुसावळ येथील एका दुकानातून प्रसिद्ध कंपनीचे तूर बियाण्याचे एकूण ७ पाकीट आणि त्यानंतर ३ जून २०२४ रोजी एक पाकीट (एका पाकिटाची किंमत ४०५ रुपये असलेली) विकत घेतले आहे. २७ मे २०२४ रोजी तूर बियाणे शेतात पेरणी केली. परंतु बियाणे न उगविल्याने बियाणे विक्रेत्याकडे रितसर तक्रार केली. त्यानंतर बी बियाणे कंपनी किंवा विक्रेत्यातर्फे संबंधित कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष शेतात व शेतकऱ्याची भेट घेऊन पाहणी केली.

बी-बियाणे कंपनीसह बियाणे विक्रेत्यांनी आपली जबाबदारी शेतकऱ्याच्या अंगावर झटकून शेतकऱ्याची प्रत्यक्ष फसवणूक केल्याचे प्रत्यक्ष प्रथमदर्शनी आणि या वर्षातले पहिले उदाहरण यावल तालुक्यात दिसून आले आहे. संबंधित शेतकरी तालुका कृषी अधिकाऱ्यांसह संबंधित सर्व अधिकाऱ्यांकडे आणि लोकप्रतिनिधीकडे तक्रार करणार आहे. तूर बियाण्याची उगवण क्षमता नव्हती का? तूर बियाणे बोगस कंपनीचे आहे का? किंवा विक्रेत्याने तूर बियाणे मुदत झाल्यानंतर (एक्सपायर डेटनंतर) विक्री केले आले आहे का? जर शेतकऱ्याकडे बियाणे खरेदीचे बिल आहे तर पुढील कार्यवाही काय होणार? असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत किंवा शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरुद्ध काय कारवाई होणार? याकडे आता संपूर्ण भुसावळ परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here