मुख्यमंत्र्यांना नुकसानीची माहिती आकडेवारीसह सादर करुन जिल्हाधिकाऱ्यांची मागणी
साईमत/जळगाव/ विशेष प्रतिनिधी :
जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या एकूण नुकसानीची माहिती आकडेवारीसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यासह नुकसान भरपाईसाठी ११५ कोटींची मागणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस धुळे येथे कार्यक्रमासाठी जाण्यासाठी मुंबईने विमानाने जळगाव विमानतळावर शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी आले होते.त्यावेळी श्री. प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर केला. या अहवालात ६५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे नमूद करून ५१८ गावे बाधित असल्याचे म्हटले आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या एक लाख ५२१ असल्याचे अहवालात नमूद केले आहे. मनुष्यहानीत पाच व्यक्तींचा मृत्यू झाला असून पाचोरा तीन मृत्यू, भुसावळ आणि मुक्ताईनगर प्रत्येकी एक मृत्यू. अतिवृष्टी व पुरामुळे एक हजार ९२२ पशुधनाचा मृत्यू, घरांच्या पडझडीत एक हजार ६८ घरे नष्ट झाली तर ६८७ घरात पाणी शिरले. त्यात पाचोरा ५९२, एरंडोल ८० आणि मुक्ताईनगर १५.
दरम्यान, काही बाधित शेतकरी, दुकानदार आणि मुख्यमंत्र्यांना विमानतळावर भेटले. मुख्यमंत्र्यांनीही बाधितांचे म्हणणे ऐकून घेतले. सुमारे २० मिनिटे एवढा वेळ देत मुख्यमंत्र्यांनी बाधित शेतकरी तसेच अधिकारी वर्गाशीही संवाद साधल्याचे दिसून आले.