साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
सेवा सहयोग फाउंडेशन ही पुणे, मुंबई येथील संस्था आहे. संस्थेअंतर्गत चाळीसगाव तालुक्यात सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाची सुरुवात सहा वर्षापूर्वी करण्यात आली. ग्रामोदय प्रकल्पाअंतर्गत पाणी विषयाला धरून सर्वप्रथम कामाला सुरुवात झाली. मूळ उद्देश शिक्षण होता. मुलांचे सतत शाळेत गैरहजर असण्याचे मुख्य कारण होत पालकांचे स्थलांतर. हे स्थलांतर रोजगारासाठी होत होत रोजगार उपलब्ध करुन द्यायचा असेल तर त्याचे मुख्य साधन शेती होती. शेती करायची असेल तर पाण्याची गरज होती. मुळात खान्देश हा कोरडवाहू भाग किंवा दुष्काळी पट्टा आणि म्हणून जर मुलांना शाळेत आणायचे असेल तर पालकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल. यासाठी शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन दिले पाहिजे. म्हणून २०१७ पासून सेवा सहयोग फाउंडेशनचे अंतर्गत पाणी विषयावर कामाला सुरुवात झाली. चाळीसगाव तालुक्यात सेवा सहयोग फाउंडेशनची पर्यावरण रक्षणासाठीची चळवळ ठरली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील जवळपास ४१ गावांमध्ये पाण्याची चळवळ पोहचविली आहे. त्यामाध्यमातून ८०० कोटी लिटर जलसाठा निर्माण केला आहे. यामध्ये ‘एक गाव एक तलाव’ ही मूळ संकल्पना राबविण्यात आली. ज्यात २१ गावांमध्ये २६ तलाव पुनर्जीवित करण्याचे काम करण्यात आले. पाण्यावर सुरु झालेली चळवळ ही पूर्णपणे लोकसहभागातून चाललेली चळवळ आहे. भूजल अभियान ही लोकसहभागातून चाललेली चळवळ सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाअंतर्गत सुरु केली.
चळवळीचा उद्देश वारकरी संप्रदायाच्या विचारांवर आधारित आहे. ज्याप्रमाणे वारकरी दरवर्षी वारीला देहू, आळंदी येथून सुरवात करतो. माऊली, तुकोबा नावाच्या जयघोषाने पाऊले ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे वाटचाल करत असतात. त्याचप्रमाणे गावागावात असे भूजल वारकरी तयार व्हावेत, ज्यातून पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब जमिनीत जिरावा. पाणी वाहून जाणार नाही, यासाठी प्रयत्न करावा. पर्यावरण सरंक्षण व्हावे, यासाठी प्रयत्न करावा. म्हणून भूजल वारकरी हा कार्यकर्ता तयार व्हावा, यासाठी भूजल अभियानाची चळवळ सुरु झाली. चळवळीत लोकसहभागाशिवाय कुठलेही काम केले जात नाही.
पाण्यासोबतच वृक्षसंवर्धनाचे काम सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु आहे. ज्यात चाळीसगाव तालुक्यात साधारणतः ३० हजार झाडांचे संवर्धन करण्याचे काम ‘वृक्षदिंडी’ उपक्रमांतर्गत सुरु आहे. या अंतर्गत शेतकरी पती-पत्नी जोडप्यांना पाच फळझाडे देऊन लोकसहभागातून लागवड केली जातात. यासोबतच ब्राह्मणशेवगे येथे निसर्गटेकडी प्रकल्प हा माळरानावर साकारण्यात येत आहे. याठिकाणी २५ हेक्टर ओसाड व पडीक क्षेत्रावर २५ हजार झाडांचे वृक्षसंवर्धन करण्यात येत आहे.जलसंधारणाच्या कामामध्ये सी.सी.टी.डिप सी.सी.टी.,गॅबियन बंधारे, नाला खोलीकरण, रुंदीकरण, बांधबंदीस्ती आदी काम शेतकरी सहभागातून पाणी समिती करुन घेतात.
तालुक्यातील ७० गावांपर्यंत पोहचली चळवळ
या कामांची दखल विविध स्तरावर घेण्यात येत आहे. युनायटेड नेशन हाय लेव्हल फोरममध्ये गेल्यावर्षी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा काम मांडण्याची संधी मिळाली होती. तसेच दिल्ली येथे जनशक्ती मंत्रालयाने जलप्रहरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. सध्या हे काम चाळीसगाव तालुक्याबरोबरच धुळे, रायगड, परभणी, लातूर आदी जिल्ह्यातील गावांमध्ये सुरु झाले आहे. या कामांसाठी विविध सामाजिक संस्था व सी.एस.आर.यांची मदत लाभत आहे. पाण्यापासून सुरु झालेले हे काम आता महिला सक्षमीकरण या विषयावर सुरु झाले आहे. या अंतर्गत २५० महिलांना प्रशिक्षण व रोजगार देऊन सक्षम करण्याचे काम सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाअंतर्गत सुरु आहे. शेतकऱ्यांना शेती कशी करावी. जमिनीची धुप कशी थांबवावी. नैसर्गिक शेती करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाचे चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण फाट्यावर सुसज्ज असे कार्यालय आहे. याठिकाणी तीन पूर्णवेळ कार्यकर्ते काम पाहतात. या माध्यमातून तालुक्यातील ७० गावांपर्यंत चळवळ पोहचली आहे.