साईमत, धुळे : प्रतिनिधी
‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमासाठी स्थापन समिती प्रमुख यांनी समन्वयातून काटेकोरपणे नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. जिल्हास्तरीय कार्यक्रम शासकीय राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बुधवारी (ता. ६) सकाळी दहाला होणार आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यक्रमासाठी आढावा बैठक झाली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाणे, गणेश मोरे, बी. एस. अकलाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप बोडके, जिल्हा परिषद जिल्हा समाजकल्याण अधिकारी मनिष पवार, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मोहन देसले, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, क्रिष्णा शिरसाट आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, कार्यक्रमाचे व्यवस्थापन व नियोजन नियुक्त नोडल अधिकारी करतील. त्यात निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे यांनी स्थापन केलेल्या समित्यांमध्ये समन्वय असावा. राजशिष्टाचाराची योग्य अंमलबजावणी करावी. लाभार्थ्यांसह वाटप होणाऱ्या साहित्याची यादी व बैठक व्यवस्था करावी. नोंदणी, दिव्यांग लाभार्थ्यांस सहकार्य व मार्गदर्शन, प्रवर्गनिहाय नोंदणी कक्ष, मूकबधिर प्रवर्गासाठी नोंदणी कक्षात दुभाषकांची नेमणूक, ऑफलाइन अर्ज संबंधित लाभार्थ्याकडून भरून घेण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती आदींवर भर ठेवावा. भोजन व्यवस्थेसह दिव्यांग यांना वैश्विक ओळखपत्र वितरित करणे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र तसेच एडीआयपीअंतर्गत प्राप्त साहित्य साधनांचे वाटप, पाणी व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, कचरा संकलन व निर्मूलन, परिसराची स्वच्छता आदींवर कटाक्ष ठेवत कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे.