साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
येथील तहसील कार्यालयात शेतकरी सेनेने (उबाठा) दिलेल्या निवेदनावर तहसिलदारांनी समस्यांवर चर्चा केली. बैठकीत शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख अनिल महाजन, दीपक सूर्यवंशी आदी शेतकऱ्यांनी समस्या मांडून विचार मांडले. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
भुसावळ तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचे निवेदन दिल्याने दीपनगर प्रकल्प, विद्युत अभियंता विभाग, कृषी अधिकारी, पोलीस विभाग, वनविभाग या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलाविण्यात आले होते. शेतकऱ्यांना पुरेसा विद्युत पुरवठा करावा, दीपनगर प्रकल्पाचे प्रदुषण कमी करावे, शेतकऱ्यांच्या केबल, ठिबक सिंचन संच, पाईप, म्हशी, चोरीला जातात, त्याची तक्रार दाखल होऊन चोऱ्या होऊ नये, यासाठी पोलीस विभागाने सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर मार्ग काढून सहकार्य करण्याचे पोलीस अधिकारी यांनी मान्य केले. बैठकीला वनविभागाचे अधिकारी हजर नसल्यामुळे त्यांना नोटीस पाठविण्याची सूचना करण्यात आली.