सोयगावला रा.काँ.तर्फे (एसपी गट) तहसिलदारांना निवेदन
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
एक हेक्टर सोयाबीन पिकांसाठी पाच हजार तर कापूस पिकांसाठी एका हेक्टरला पाच हजार असे स्वतंत्र अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु २०२३ खरीप हंगामात ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल, अशी अट घालण्यात आल्यामुळे हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ई-पीक पाहणी केलेल्या व न केलेल्या वंचित शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी अर्थात गुरुवारी, १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोयगावच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याचे निवेदन ज्येष्ठ नेते रंगनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगावच्या तहसिलदारांना देण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोयगाव तालुकाध्यक्ष डॉ.इंद्रजीत सोळुंके, शहराध्यक्ष रवींद्र काळे, दीपक देशमुख, अजय नेरपगार, समाधान थोरात, कृष्णा जुनघरे, चंद्रकांत काळे, मो.आरिफ यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तालुक्यात २०२३ च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड करून ई-पीक पाहणी केलेले २९ हजार शेतकरी अनुदानास पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाने जाहीर केली आहे. परंतु ही पीक पाहणी न केलेल्या सुमारे १२ हजार २१४ कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेतून शासनाने वगळले आहे. सोयाबीन पिकांसाठी ११ हजार २४४ पैकी आठ हजार ६१७ शेतकरी पात्र ठरले आहेत. दोन हजार ६२६ शेतकरी अपात्र ठरले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.