पांझरा रिव्हर फ्रंटसह विविध मागण्यांवर मंत्रालयातील बैठकीत कार्यवाहीची ग्वाही
साईमत/धुळे/प्रतिनिधी :
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा प्रकल्पात १०० टक्के जलसाठा करण्यासह भविष्यातील गरज पाहता प्रकल्पामध्ये धुळे शहरासाठी पुढील ५० वर्षांकरिता पाण्याचे आरक्षण करण्याची गरज आहे. शहरातून वाहणाऱ्या सुशी नाल्याच्या दोन्ही काठांवर रिटेनिंग वॉल बांधून नाल्याचे संवर्धन करणे, पांझरा रिव्हर फ्रंटअंतर्गत दोन्ही काठांवर विविध कामांसह सुशोभीकरण करणे, प्रकाशा-बुराई प्रकल्पातून मालनगाव धरणापर्यंत स्वतंत्र उदनलिका टाकून मालनगाव धरण पूर्ण क्षमतेने भरणे, अशा आ.अनुप अग्रवाल यांच्या आग्रही मागण्यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेत त्वरित कार्यवाही करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
मुंबई येथील मंत्रालयात मंगळवारी, १७ जून रोजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध मागण्यांबाबत आढावा बैठक झाली. त्यात आ.अग्रवाल यांनी पाच मागण्यांबाबत मंत्री महाजन यांच्याशी चर्चा करुन मागण्या मंजूर करण्यासाठी साकडे घातले. त्यावर जलसंपदामंत्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आ. अग्रवाल यांनी केलेल्या मागण्यांबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी आ.अग्रवाल, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, आ.राम भदाणे, भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, मनपाचे आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
५० वर्षांचे नियोजन करण्याची गरज
धुळे शहराला सध्या अक्कलपाडा प्रकल्पासह तापी योजना, नकाणे तलाव, डेडरगाव तलावातून पाणीपुरवठा होतो. शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुढील ५० वर्षांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पात पुढील ५० वर्षांसाठी पाण्याचे आरक्षण करण्याची मागणी आ.अग्रवाल यांनी केली. याबाबत मंत्री महाजन यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.