साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत खान्देशातील कर्मयोगी धनाजी नाना चौधरी यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन धनाजी नाना महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.आय.जी.गायकवाड यांनी केले. ते धनाजी नाना चौधरी यांच्या जे १३३ व्या जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त करतांना बोलत होते. कार्यक्रमाला तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी, चेअरमन लिलाधरशेठ चौधरी, सचिव एम. टी. फिरके, सहसचिव एन. ए. भंगाळे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. जगदीश पाटील, विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. पी. डी. पाटील, उप प्राचार्य डॉ. एस. व्ही. जाधव आणि महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक सण- उत्सव समितीचे चेअरमन डॉ.मारोती जाधव यांनी केले. प्रास्ताविकात जनसेवा ही ईश्वर सेवा म्हणून जीवनभर अविरत कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे कर्मयोगी धनाजी नाना चौधरी होत. त्यांच्या कार्यामुळे खान्देशाचे नाव फैजपूरच्या माध्यमातून भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. यावेळी धनाजी नाना महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. आय. जी. गायकवाड यांनी धनाजी नाना चौधरी यांच्या कार्याची माहिती दिली. स्वातत्र्यपूर्व काळातील भारताला स्वातंत्र्य चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले. त्यांचा जन्म १४ मे १८९१ रोजी खिरोदा, ता. रावेर, जि. जळगाव येथे शेतकरी कुंटुंबात झाला. ते उच्चशिक्षण घेतल्यानंतर ब्रिटीश सरकारच्या पोलीस दलात नाशिक येथे फौजदार पदावर कार्यरत होते. परंतु नंतर त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी फौजदाराची नोकरी सोडून खेड्यांमध्ये काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी १९३४ मध्ये खिरोदा येथे स्वराज्य आश्रमाची स्थापना केली. यातून भारतीय स्वातंत्र्यलढयाचे कार्य चालू ठेवले. याच कार्याची दखल घेउन त्यावेळी अनेक प्रांतामध्ये काँग्रेसचे अधिवेशन घेण्याच्या स्पर्धा असतानाही त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन १९३६ ला फैजपूर येथे आयोजित केले आणि ते यशस्वीरीत्या पार पाडले. जीवनभर त्यांनी सातपुड्यातील आदिवासींच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य केले. अशा विविध कार्यावर प्रा. गायकवाड यांनी प्रकाश टाकला. यशस्वीतेसाठी शेखर महाजन, सिद्धार्थ तायडे यांनी परिश्रम घेतले. आभार प्रा. एस.के. पाडवी यांनी मानले.