साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी लागवड केलेले पीक कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी आदी पिकांची परिस्थिती पावसाचा खंड पडल्याने अतिशय वाईट झाली आहे. पाचोरा आणि भडगाव तालुक्यात सरासरी पर्जन्यमान फार कमी असल्याने पिकांची वाढ खुंटलेली आहे. परिणामी बळीराजा संकटात सापडलेला आहे. तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यात मागील २५ दिवसापासून पावसाचा खंड पडल्याने पूर्णपणे पीक वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. यामुळे शासनाने पाचोरा व भडगाव तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. अश्ाा आशयाच्या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तालुकाध्यक्ष तथा पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले.
पिक विम्याची माहिती घेतली असता भडगाव तालुक्यातील साधारण २५ हजार शेतकऱ्यांनी व पाचोरा तालुक्यातील साधारण ४४ हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सर्वसमावेशक पिक विमा योजनामधुन विमा उतरविलेला आहे. पिक विम्याच्या शासन निर्णयानुसार सलग २१ दिवस पावसाचा खंड (२.५ mm पेक्षा कमी पाऊस) पडल्यास शेतकऱ्यांना पिक विम्याची २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई देय आहे. पावसाची नोंद ही महसूल मंडळांमध्ये लावलेले स्वयंचलित हवामान यंत्रात होत असते. हा डाटा ‘महावेध’ याठिकाणी नोंदणी होत असतो.
नुकसान भरपाई देण्यात यावी
महावेध पावसाचा अहवाल मागविला असता पाचोरा तालुक्यातील वरखेडी महसूल मंडळातच पावसाचा खंड पडल्याची नोंद झालेली आहे. उर्वरित सर्व महसूल मंडळे व भडगाव तालुक्यात सर्व महसूल मंडळात पावसाचे नोंदणीबाबत शंका निर्माण झाली आहे. परंतु इतर मंडळात पिकांची परिस्थिती सारखीच असल्याने त्या भागात नुकसान भरपाई देण्यात यावी.
कृषी विभागाकडून दुर्लक्षचा आरोप
महसूल मंडळांमध्ये बसविलेले स्वयंचलित हवामान केंद्र यामध्ये कमी व जास्त तापमान वादळी वारे व पावसाची नोंद होते हे निकषाप्रमाणे न बसविता चुकीच्या ठिकाणी बसवलेली आहे. याठिकाणी कुठल्याही नोंदी व्यवस्थित होत नाही. पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी हे नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकरीता मागील कालावधीत वेळोवेळी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी आणि प्रशासन यांना निवेदन देऊन हवामान केंद्राची कुठलीही देखभाल दुरुस्ती व पाहणी केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अमोल शिंदे यांनी केला.
शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेतच
तालुक्याचे आमदार शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. पाचोरा-भडगावमधील सोयाबीन उत्पादक शेतकरी पिक विमापासून वंचित राहिले. यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आली. त्यावर आमदारांकडून कुठलाही मार्ग निघाला नाही. तसेच भडगाव तालुक्यातील २०१९ मध्ये झालेल्या वादळीवारा व गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यासाठी भडगाव तालुक्यातील विविध शेतकरी संघटना व भारतीय जनता पार्टी यांनी निवेदने दिले. मात्र, आमदारांनी अद्यापही हा प्रश्न मार्गी लावलेला नाही. पाचोरा-भडगाव तालुक्यात पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडलेला असताना विहिरीतील पाणी पिकांना देण्यासाठी शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा सुरळीत पद्धतीने होत नाही.
आमदारांकडून सोईस्करपणे शेतकऱ्यांची दिशाभूल
मागील चार वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या अशा अनेक समस्या आहेत. त्यापैकी आमदारांनी कुठलीच समस्या मार्गी लावलेली नाही. आमदार हे केवळ मोठमोठ्या वल्गना करतात आणि सोईस्करपणे शेतकऱ्यांची दिशाभूल करतात, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी केला.