साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील गंगापुरी येथील विवाहितेचा विद्युत वजन काट्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी, २७ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. यामुळे कानुमातेच्या उत्सवासाठी घरी आलेल्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारती घनश्याम पाटील (वय ३०, रा. गंगापुरी, ता. धरणगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील गंगापुरी येथील घनश्याम रायभान पाटील हे पत्नी भारती पाटील आणि दोन मुलांसह सुरत येथे वास्तव्याला आहे. कानुबाईचा उत्सव असल्याने घनश्याम पाटील हे पत्नी व दोन्ही मुलांसह गंगापुरी येथे आलेले होते. रविवारी, २७ ऑगस्ट रोजी घनशाम पाटील हे आईवडिलांसह सकाळी शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी विवाहिता भारती आणि दोन्ही मुले घरीच होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भारतीबाईची दोन्ही मुले रडत आरडाओरड करायला सुरूवात केली. शेजारी राहणाऱ्यांना आमची आई बेशुध्द पडली असल्याचे सांगितले. शेजारी राहणाऱ्या महिला व ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यांच्या हातात वजन काट्याची इलेक्ट्रीक पीन हातात दिसली. त्यामुळे त्यांचा इलेक्ट्रीक शॉकचा धक्का लागल्याने त्या बेशुध्दावस्थेत आढळून आल्या. ग्रामस्थांनी मिळून भारती पाटील यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन तिला मयत घोषित केले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पो.हे.कॉ. ईश्वर शिंदे करीत आहेत.