सेंट्रल रेल्वेचे व्यवस्थापक धर्मवीर मीना यांचे आश्वासन
साईमत/धुळे/प्रतिनिधी :
शहरासह जिल्ह्यातील प्रवाशांसाठी धुळे येथून मुंबई आणि पुण्यासाठी रोज रात्री एसी कोचसह रेल्वेसेवा सुरू करण्यासह मुंबई व पुण्याहूनही रोज रात्री धुळ्यासाठी एसी कोचसह रेल्वेसेवा लवकरच सुरू करण्याचे आश्वासन सेंट्रल रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी धुळे शहराचे आ.अनुप अग्रवाल यांना दिले.
मुंबई येथे सेंट्रल रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीना, रेल्वेचे प्राधान्य मुख्य अभियंता रजनीश माथूर, पीसीओएम एस. एस. गुप्ता, पीसीसीएम अरविंद मालखेडे, सीपीआरओ स्वप्नील नीला, उपसरव्यवस्थापक के. के. मिश्रा आदी अधिकाऱ्यांची आ.अग्रवाल यांनी भेट घेत त्यांच्याशी धुळे शहराच्या रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी सरव्यवस्थापक मीना यांनी आ.अग्रवाल यांनी केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करत त्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
धुळे शहरासह जिल्ह्यातील व्यापारी, विद्यार्थी व नागरिक रोज मोठ्या संख्येने पुण्या-मुंबईकडे ये-जा करतात. शिवाय धुळ्यासह खान्देशातील हजारो नोकरदार पुणे- मुंबईत वास्तव्यास आहेत. सध्या धुळ्याहून सकाळी धुळे- दादर रेल्वेसेवा सुरू आहे. मात्र, पुण्यासाठी कुठलीही रेल्वे सेवा नाही. रात्रीच्या वेळी मुंबई व पुण्याकडे जाण्यासाठी रेल्वेची सोय नसल्याने प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा पार्श्वभूमीवर धुळे स्थानकातून मुंबई व पुणे अशा दोन्ही महानगरांसाठी रोज रात्री एसी कोचसह तातडीने रेल्वे सुरू करण्याची गरज व्यक्त केली. तसेच मुंबई व पुणे येथूनही धुळ्यासाठी रोज रात्री एसी कोचसह रेल्वे सुरू झाल्यास हजारो प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. याद्वारे रेल्वेलाही मोठे उत्पन्न मिळू शकेल. त्यामुळे दोन्ही शहरांसाठी तातडीने रेल्वे सुरू करण्याची आग्रही मागणी आ.अग्रवाल यांनी केली.
मीना यांनी आ.अग्रवाल यांच्या मुंबई व पुण्यासाठी रोज रात्री एसी कोचसह रेल्वे सुरू करण्याच्या मागणीबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. सद्यःस्थितीत मुंबई व पुणे अशा दोन्ही रेल्वेस्थानकांच्या फलाट वाढीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होताच मुंबई, पुण्यासाठी धुळे येथून व पुणे-मुंबईहून धुळ्यासाठी रोज रात्री एसी कोचसह रेल्वे सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मालेगाव रोड क्रॉसिंगवर पूल करा
धुळे शहरासाठीच्या रेल्वेशी संबंधित आणखी एका महत्त्वाच्या विषयावर रेल्वे अधिकाऱ्यांचे आ.अग्रवाल यांनी लक्ष वेधले. मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव रस्त्यावर एलीसी २२ याठिकाणी धुळ्यात प्रवेश करताना रेल्वे क्रॉसिंग आहे. या महामार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रेल्वे ये-जा करताना गेट बंद ठेवावे लागत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यात वाहनधारकांचा बराच वेळ वाया जातो. तसेच अपघातांची शक्यताही निर्माण होते. त्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर तातडीने उड्डाणपूल उभारावा, महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहून अपघातही होणार नाहीत. याबाबत तातडीने सर्वेक्षण करून पुलाला मंजुरी देण्याची ग्वाहीही सेंट्रल रेल्वेचे सरव्यवस्थापक मीना यांनी आ.अग्रवाल यांना दिली.