भाजपतर्फे स्मारकाजवळ फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार जल्लोष
साईमत/धुळे/प्रतिनिधी :
शहरात सुरू असलेल्या विकासकामांना विरोध करण्याचे, खास करून छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोधाचे कारस्थान करत उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने त्यांना सणसणीत चपराक बसली आहे. त्यामुळे आता रयतेचे राजे असलेल्या छत्रपतींचे स्मारक मोठ्या उत्साहाने, दिमाखदारपणे भव्य स्वरूपात पूर्ण होईल. उबाठाच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांना आता जनताच उत्तर देईल. विरोधकांना आणखी कुठे जायचे असेल तर खुशाल जावे, असे आव्हान आ.अनुप अग्रवाल यांनी दिले.
शहरातील मनोहर चित्रपटगृहाजवळ सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत खासगी जागेवर हे काम होत असल्याचे व ही जागा स्मारकाच्या नावाखाली हडप करण्याचे कारस्थान केले जात असल्याचा आरोपही केला होता. याचिकेवर दोन दिवसांपूर्वी सुनावणी होऊन न्यायालयाने निर्णय देताना ही याचिका फेटाळून लावली. अखेर सत्याचा विजय झाला, असे म्हणत भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, सुनील बैसाणे, भिकन वराडे, शशी मोगलाईकर, आकाश परदेशी, वैशाली शिरसाट, मोहिनी धात्रक, किशोर चौधरी, सुबोध पाटील, कमलाकर पाटील, पंकज धात्रक, ज्ञानेश्वर पाटील, हर्ष रेलन, भगवान गवळी, पप्पू डापसे, जयेश मगर, बंटी धात्रक, रमेश करनकाळ, विनोद खेमनार, पृथ्वीराज पाटील, सचिन पाटील, पवन जाजू, सुरेश बहाळकर, प्रकाश उबाळे, अनिल सोनार, पंकज विंचू, राकेश कुलेवार, ॲड. किशोर जाधव, जीवन शेंडगे, राजेश शहा, सागर कोडगीर, शरद बिरारी, शिवाजीराव काकडे, कैलास कासार, विकी परदेशी, रोहित चांदोडे, सुनील देवरे, सुहास अंपळकर, भीमा शर्मा, शीला भडागे, मीनल जगताप, अशोक माळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जनतेची दिशाभूल करण्याचा विरोधकांनी केला प्रयत्न
उबाठाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदा घेत स्मारकाला विरोध करताना वैयक्तिक माझ्यावरही अनेक आरोप करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी त्यावर कुठलीच प्रतिक्रिया न देता माझे काम सुरूच ठेवले आहे. यापूर्वीही टॉवर गार्डनचे काम थांबविल्यावर त्यांना जनतेने उत्तर दिले. आताही जनताच त्यांना उत्तर देईल. माझा विरोधकांवर कुठलाच रोष नाही. मी शहराच्या विकासासाठी काम करतच राहणार, असेही आ.अग्रवाल यांनी सांगितले.