MLA Kishor Patil : बँकांच्या मनमानीबाबत तक्रारी येऊ नये : आ. किशोर पाटील

0
6

पाचोऱ्यात पत्रकारांनी बँक व्यवस्थापकांना धरले धारेवर

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

गेल्या काही दिवसांपासून शहरातील राष्ट्रीयकृत बँकाचे एटीएम कोणत्या ना कोणत्या कारणांनी बंदावस्थेत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य जनतेसह ऐन खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना शेती आणि अन्य कामांसाठी रोख स्वरूपात पैश्यांची गरज तसेच विविध अनुदानाच्या रकमा त्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्या असताना केवळ एटीएम बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा प्रश्न उपस्थित झाला होता. शेतकरी आणि जनतेने जागरूक पत्रकारांकडे बँकांच्या मनमानी कामकाजांबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या. पत्रकारांनी हा विषय गांभीर्याने घेत राष्ट्रीयकृत बँका, आणि अन्य संस्थांनी सुरू केलेल्या एटीएम बंदबाबत आवाज उठवत २९ मे रोजी आ. किशोर पाटील यांचे प्रतिनिधी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील आणि प्रांताधिकारी भूषण अहिरे यांना लेखी निवेदन दिले होते.

निवेदनात काही मुजोर झालेल्या बँक व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांकडून विविध बँकांमध्ये सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, अपंग वृद्ध यांना मिळणारी वागणूक, बँक ग्राहकांसाठी बँकेत बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आवश्यक सोयी-सुविधा, पार्किंग तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांची ग्राहकांसोबत बोलण्याची, वागण्याची आणि विविध प्रकारच्या तक्रारीबाबत निवेदन देऊन आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातल्या सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी केली होती.

आमदारांकडून निवेदनाची दखल अन्‌ तातडीची घेतली बैठक

जागरूक आणि जनतेच्या समस्याबाबत दिलेल्या निवेदनाची आ.किशोर पाटील यांनी दखल घेत प्रांताधिकाऱ्यांना सर्व बँकांचे मॅनेजरांची बैठक घेण्याचे आदेश दिल्यावरून शुक्रवारी, ३० मे रोजी प्रांताधिकारी दालनात आ.किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी भूषण अहिरे, जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख सुनील पाटील, भीमसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण ब्राह्मणे यांच्यासह निवेदन देणारे पत्रकार उपस्थित होते.

शहरातील राष्ट्रीयकृत बँकांबाबत निवेदनात नमूद केलेल्या तक्रारी, मागण्याबाबत आमदारांनी विविध बँकांच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. तसेच शेतकरी खातेदार, ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी-सुविधांबाबत, बेरोजगारांना मुद्रा लोनमधील शेतकऱ्यांना विविध योजनेतून किती लाभार्थ्यांना कर्ज वाटप केले. याबाबत माहिती घेतली तसेच अनेक वर्षांपासून महाराष्ट्र, सेंट्रल आणि अन्य काही बँका कोणत्याही सुविधा नसलेल्या इमारतीत बँका का चालवित आहे. स्वतःच्या जागा का घेत नाही आणि जनतेच्या बँक अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत ज्येष्ठ नागरिक व्ही.टी.जोशी, पत्रकार सी.एन.चौधरी, संदीप महाजन, लक्ष्मण सूर्यवंशी, राहुल महाजन, निखिल मोर यांनी बातमीच्या चर्चेत भाग घेऊन बँक अधिकारी ग्राहकांना काय सुविधा देतात. पात्र लाभार्थी गरजूंना किती आर्थिक लाभ दिले. शेतकरी, जनतेच्या विविध समस्यांसाठी काय करतात, अशा अनेक तक्रारीबाबत विचारणा करून त्यांना धारेवर धरले होते.

आमदारांकडून सक्त निर्देश

शहरातील राष्ट्रीयकृत सह बँकांच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, अपंग वृद्ध, विद्यार्थी आणि सर्व प्रकारच्या बँक ग्राहकांना आवश्यक सुविधा दिल्या पाहिजे. यापुढे कोणत्याही तक्रारी येता कामा नये, आवश्यक आणि विविध योजनांचे लाभार्थ्यांना राज्य, केंद्र सरकारने घोषित केलेल्या योजनातून आर्थिक लाभाचे प्रकरणे मंजूर करावे. काही ठराविक ग्राहकांकडे करू नये. बँक अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षकांनी बँकेत येणाऱ्या लोकांशी मर्यादित वागावे आणि ज्या बँक सुविधा नसलेल्या इमारतीत सुरू त्यांनी स्वतंत्र सोईस्कर जागा घेऊन बँका स्थलांतरित कराव्या, त्यासाठी आवश्यक ती मदत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यास तयार असल्याची ग्वाही, आ.किशोर पाटील यांनी बैठकीच्या समारोपात दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here