जैन हिल्सला राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५चा समारोप
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जागतिकदृष्ट्या भारतात लिंबू वर्गीय फळ बागांमुळे शेतकऱ्यांची उन्नती मार्ग सापडत आहे. प्रक्रिया उद्योगातून निर्यात वाढण्यासाठी खासगी संस्था, शैक्षणिक संस्थांसह धोरणकर्ते यांनी सामुहिकपणे कार्य केले पाहिजे. रोपांची निगा, झाडांच्या पोषणमूल्यांसाठी आधुनिक सिंचन पद्धती, रोपवाटिकांसाठी लॅबोरेटी प्रमाणपत्र सक्तीकरण, रुफस्टॉक व रोपांमध्ये व्हायरस न जाण्यासाठी प्राथमिक काळजी, शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यातूनच चांगल्या फळ बागा फुलतील, असे मनोगत माजी डीडीजी हॉर्टिकल्चर डॉ. एन. के. कृष्णकुमार यांनी शास्त्रज्ञांसमोर मांडले.
लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) च्या समारोपावेळी ते बोलत होते. त्यांच्यासह बदनापूर मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील मान्यवरांच्या उपस्थितीत सहभागींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. परिश्रम, बडी हंडा व सुबीर बोस हॉल येथे तांत्रिक सत्र झाले. त्यात डॉ. इंद्रमणी मिश्रा यांनी फळबागांमध्ये ड्रोनचा वापर यावर सादरीकरण केले. डॉ. आशिष वरघणे यांनी जागतिक तुलनात्मक संशोधन पेपर्स सादर केला. सोनल नागे यांनी पर्यावरणपूरक फवारणीवर भाष्य केले. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. एन. के. कृष्णकुमार, उपाध्यक्ष म्हणून डॉ. एम. कृष्णा रेड्डी, डॉ. संदीप सिंग, डॉ. मंजुनाथ, डॉ. आशिष वरघणे उपस्थित होते. बडीहंडा हॉलमध्ये झालेल्या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी एम. एस. लधानिया होते.
वाढ, अस्थिरता, शाश्वतता आणि भविष्यातील अंदाज यांच्या एकात्मिक विश्लेषणाद्वारे भारताच्या लिंबूवर्गीय क्षेत्रातील प्रादेशिक वाढीच्या गतिमानतेचे मूल्यांकन या विषयावर सौरभ रॉय यांच्या वतीने त्यांचे सहकारी डाॅ. दर्शन कदम यांनी सादरीकरण केले. प्रगत सिट्रीकल्चर तंत्रज्ञानाचा अवलंब करून लिंबूवर्गीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, महाराष्ट्रातील यशोगाथा यावर आयसीएआयआरच्या शास्त्रज्ञ डाॅ. संगीता भट्टाचार्य यांनी मांडणी केली. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सहयोगी प्रा. डाॅ. गजानन मोरे फळ गळती व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करण्यामधील तांत्रिक तफावत यावर मांडणी केली.
शेतकरी, उद्योजक, शास्त्रज्ञांची चर्चा
लिंबूवर्गीय फळपिकांच्या क्षेत्रासमोर आज विविध प्रकारची आव्हाने उभी राहिलेली असली तरी त्याचबरोबर मोठ्या संधीही उपलब्ध आहेत. या संधींचा योग्य वापर करण्यासाठी निरोगी रोपे, शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि भरीव गुंतवणूक आवश्यक असल्याचे मत देशभरातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. जैन हिल्स आयोजित राष्ट्रीय लिंबूवर्गीय परिषदेच्या शेवटच्या दिवशी लिंबूवर्गीय क्षेत्राचा विकास : विस्तार, नवोपक्रम, उद्योजकता, धोरणात्मक निर्णय आणि व्यापार प्रगती या विषयावर शेतकरी, उद्योजक, शास्त्रज्ञ, अभ्यासक व धोरणकर्त्ये यांच्या तांत्रिक परिसंवादातून चर्चा करण्यात आली.
