साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. ग्रामीण आणि शहरी पातळीवर स्वच्छता ही महत्त्वाची आहे. लोकसहभागाचा तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सदृढ निरोगी राहण्यासाठी तसेच सदृढ भारतासाठी “स्वच्छता ही सेवा” अभियान वरदान ठरणार आहे. त्यासाठी सांघिक प्रयत्न गरजेचे आहे. स्वच्छता हीच ईश्वरीय सेवा मानून स्वच्छ गाव, सुंदर शहर ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी समाजाप्रती आपले निरंतर कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. राज्यातील स्वच्छतेच्या महाश्रमदानाच्या कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्र्यांनी स्वतःच्या पाळधी गावातून केली.
१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता ही सेवा (SHS) थीम “कचरामुक्त भारत” उपक्रमाचे आयोजन केले होते. पंधरवड्यानिमित्त पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून “१ तारीख, १० वाजता, एक घंटा,” १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. पाळधी येथे स्वच्छतेच्या महाश्रमदानाकरीता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपध देण्यात आली. गावातील सर्व शाळा, आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन, अंगणवाड्या, शासकीय कार्यालये व विविध भागात स्वच्छता करण्यासाठी श्रमदान करण्यात आले.
अभियानात यांनी नोंदविला सहभाग
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच लक्ष्मी शरद कोळी, प्रकाश पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भरत कोसोदे, पोलीस निरीक्षक सचिन शिरसाट, विस्तार अधिकारी वासुदेव महाजन, तालुका समन्वयक सपना पाटील, रवींद्र चव्हाण, शेतकी संघाचे संचालक संजय महाजन, नारायण सोनवणे, गोकुळ पाटील, बबलू पाटील, अरविंद मानकरी, उपसरपंच दिलीप पाटील, रवींद्र पाटील, ज्येष्ठ नागरिक डॉ. बिचवे, केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे, ग्रामविकास अधिकारी दीपक पाठक, स्वच्छता तज्ज्ञ मनोहर सोनवणे, भगवान पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका, शिक्षक वृंद तसेच जैन उद्योग समूहाचे कर्मचारी, सर्व शासकीय कर्मचारी, ग्रामस्थांनी अभियानात सहभाग नोंदविला.
विविध उपक्रमाबाबतची माहिती
प्रास्ताविकात स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भरत कोसोदे यांनी जिल्ह्यात स्वच्छतेबाबत पंधरवाड्यात राबविलेल्या विविध उपक्रमाबाबतची माहिती सविस्तरपणे विशद केली. सूत्रसंचालन मुख्याध्यापिका ज्योती पाटील तर आभार केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे, ग्रामविकास अधिकारी दीपक पाठक यांनी मानले.