साहित्य, शैक्षणिक क्षेत्रासह सर्व स्तरातून होतोय कौतुकाचा वर्षाव
साईमत/चोपडा/प्रतिनिधी :
येथील साहित्यिक राजेंद्र पारे यांना साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल शिरपूर येथील समता उत्कर्ष समितीतर्फे आयोजित ‘काकासाहेब बैसाणे जीवन गौरव’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. शिरपूर येथील सिटी प्राईड उत्सवाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. तुषार बैसाणे लिखित ‘बाप माय’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ. तुषार रंधे, आशा रंधे, पिंटू शिरसाठ, भदंत आनंद, डॉ. दीपाली सोसे, डॉ. माधवराव कदम, युवराज माळी, डॉ. फुला बागूल, डॉ. सतीश मस्के, प्राचार्य सारीका रंधे, आशा बैसाणे मान्यवर उपस्थित होते.
गणपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत राजेंद्र पारे हे कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना राज्य शासनाचा शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागचं दार, ठिगळ अन् टाके, बुद्धा इज स्माईलिंग, निब्बान, धावपट्टीवरचा अनोखा प्रवास,आपले संविधान आपला सन्मान आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. तसेच त्यांच्या ”आकांक्षा’ ह्या कथेचा जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बी.ए.प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी डॉ. तुषार बैसाणे, पनीराज बैसाणे, संजय जाधव, जितेंद्र भदाणे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्वाला मोरे तर आभार पनीराज बैसाणे यांनी मानले. राजेंद्र पारे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल साहित्य, शैक्षणिक यांच्यासह सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.