जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील जळके येथील ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. दरम्यान, डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने नैराश्यातून तरुणाने हे घातक पाऊल उचलल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जळके येथील धनराज संतोष जाधव (वय ३६) हा तरुण मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या सोबत पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. पत्नी सीमा ही दोन दिवसांपूर्वीच मुलांसह माहेरी जळगाव जामोद येथे गेलेली आहे. त्यामुळे
धनराज जाधव हा घरी एकटाच होता. सोमवारी घरात एकटाच असतांना आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. जाधव राहत असलेल्या परिसरात त्याचे आई-वडिल व भाऊ राहतात. आईवडील सायंकाळी शेतातून घरी परतल्यानंतर त्यांना धनराज याने गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच जळकेकर महाराज यांच्यासह पोलीस पाटील संजय चिमणकर यांनी घटनास्थळ गाठत धनराज यास जिल्हा रुग्णालयात हालविले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती मृत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, धनराज जाधव हा काही दिवसांपासून कर्जबाजारीपणामुळे नैराश्यात होता. त्यातुनच त्याने हे पाऊल उचलले असल्याचे ग्रामस्थांकडून चर्चिले जात असल्याचे समजते.