लक्षणे नाहीत मग कोरोनाग्रस्त कसे म्हणता  येईल?

0
9

कोरोना` पॉझिटिव्ह पण लक्षणे नाहीत,
मग रुग्णसंख्या जास्त का म्हणावी?
जळगाव ः विशेष प्रतिनिधी

सद्यस्थितीत कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे मात्र पहिल्या व दुसऱ्या लाटेसारखा कहर यावेळी दिसून येत नाही हे विशेष. जिल्ह्याचा विचार करता येथील रुग्णसंख्या दैनिक स्वरूपात वाढती आहे परंतु यावेळी कोविड सेंटर गजबजलेले नाहीत आणि जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्यापपावेतो फक्त कोरोना रुग्णांसाठी सारे रुग्णालय आरक्षित नाही.उल्लेखनीय की,रोजची वाढलेली रुग्णसंख्या सांगतांना आता “लक्षणे नसलेले“असे रुग्ण सांगितले जात आहेत.म्हणजे नेमके कोरोनाग्रस्त किती?,लक्षणे नाहीत तर मग त्यांना कोरोनाग्रस्त कसे म्हणता येईल?असे प्रश्न येथे चर्चेत असून सारीच संभ्रमावस्था आहे.
मार्च 2020 पासून साऱ्या देशात आणि दुनियेत कोरोनाचा कहर सुरु  झाला होता आणि तेव्हाच लॉकडाऊन, पॉझिटिव्ह, प्रतिबंधित क्षेत्र ,सॅनिटायझर, सोशल डिस्टनसिंग, मास्क आदी शब्द सर्वत्र प्रचलित झाले.विशेष की, त्या पहिल्या लाटेत या शब्दांबद्दल जेव्हढी काही जागरूकता, गंभीरता आणि भीती व धास्ती आणि दहशत सुद्धा होती ती दुसऱ्या लाटेत 50 टक्क्यांवर आली होती आणि आताच्या तिसऱ्या लाटेत तर अत्यावश्‍्यक म्हटला जाणारा मास्कसुद्धा वापणारांची संख्या बोटावर मोजण्या इतपत आहे.म्हणजे “कोरोना “पर अब “क्यो रोना“अशीच लोकभावना दिसून येत आहे.हे शहरातील फेरफटका मारता प्रत्यक्षपणे आढळते व दिसूनही येते.
जळगाव शहरात शेजारच्या गावातून येणाऱ्या एका ग्रामस्थाने सांगितलेल्या काही गोष्टी नक्कीच विचार करायला लावणाऱ्या आहेत.ते म्हणाले ,भाऊ जेव्हा खरोखरीच लॉकडाऊन होते म्हणजे रस्त्यावर कर्फ्यु,बाजार बंद,दुकाने बंद,मार्केट बंद सर्वत्र शुकशुकाट होता तेव्हा रोजच्या रोज शंभर-दोनशेवर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते आणि जेव्हा दुसरी लाट संपली (किंवा शासन स्तरावरून आटोक्यात आल्याचे जाहीर झाले )तेव्हा रस्ते, बाजार,दुकाने,मॉल, कॉम्प्लेक्स,नाट्यगृहे,सिनेमगृहे,उद्याने ,जिम आदी गजबजलेली होती,
कुठेच गर्दी कमी नव्हती तेव्हा कोरोना सुट्टीवर गेला होता काय?.कारण सर्वत्र प्रचंड गर्दी कल्लोळ व कुठेच सोशल डिस्टनसिंग नाही व कुठेच मास्कचा वापर ना सॅनिटायझरचा वापर तेंव्हा रुग्णसंख्या शून्यावर कशी? हा त्या ग्रामस्थ अडाणी माणसाचा प्रश्न.आहे की नाही,विचार करायला लावणारा विषय.
खरे सांगायचे हे की,आताच्या तिसऱ्या लाटेत लोक,नागरिक कोणीही कोरोना गंभीरतेने घेतांना दिसून येत नाही.बाजारपेठा गजबजलेल्या आहेत.मास्क लावणारे बोटावर मोजण्या इतकेच आहेत,सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडविला जातो आहे.विशेष की,शासन  व प्रशासन जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतांना कोणीच त्यास प्रतिसाद देतांना दिसून येत नाही व स्थानिक पोलीस, महापालिका प्रशासन सुध्दा त्याबद्दल गंभीर दिसून येत नाही .
उल्लेख करण्याजोगी महत्वाची बाब म्हणजे यावेळी दैनंदिन कोरोनाची रुग्णसंख्या सांगतांना “लक्षणे नसलेले रुग्ण “असा नवा शब्दप्रयोग वापरला जातो आहे.पूर्वी सर्दी, खोकला,ताप, घसा खवखवणे ही कोरोनाची लक्षणे सांगण्यात येत होती व समजली जात होती त्या पहिल्या लाटेत तर कोणी नुसता खोकताना दिसला तर त्याच्यापासून लोक चार हात दूर पळत होते  आणि आता तशी लक्षणे नसलेले लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत,याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहेच व अनेक प्रश्नही आहेत.
परवाच्या शुक्रवारी कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 1515 सांगण्यात आले होते.त्यात लक्षणे नसलेले रुग्ण होते 1468 आणि लक्षणे असलेले रुग्ण होते 47.आता यात खरी  रुग्ण संख्या 1515 म्हणावी की 47. आरोग्य विभाग सांगतो 1468 ना लक्षणे नाहीत.मग रुग्णसंख्या 1515 का सांगता ?. सर्दी,खोकला,घसा खवखवणे ,ताप आदी कोरोनाची लक्षणे सांगितली आहेत  व ती लक्षणेच नाहीत तर 1468 लोक कोरोना बाधित कसे म्हणता येतील ?
सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरू असतांना शासन स्तरावरून आणि जिल्हा पातळीवर जिल्हा,पोलीस व महापालिका प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना पाळण्याचे जसे मास्क,सोशल डिस्टनसिंगचे आवाहन करण्यात येत आहे मात्र त्यास लोकांचा शून्य प्रतिसाद दिसतो हे बाजारपेठ व रस्त्यावरील स्थिती पाहता म्हणता येईल.
त्यातच “लक्षणे नसलेले रुग्ण “ या शब्दांबद्दल संभ्रम वाढला आहे.अहो,लक्षणेच नाहीत तर त्यांना कोरोना रुग्ण म्हणून मोजता व सांगताच कशाला व वाढलेली आकडेवारी  सांगून लोकांना घाबरविता कशाला, असे लोक म्हणू लागले आहेत.परवाची स्थिती पाहता एकूण ऍक्टिव्ह रुग्ण 1515 सांगितले व त्यात लक्षणे नसलेले 1468 होते. म्हणजे खऱ्या अर्थाने लक्षणे असलेले  फक्त आणि फक्त 47 रुग्ण होते.47 ही लक्षणे असलेली रुग्णसंख्या जिह्याच्या लोकसंख्येच्या मानाने व तुलनेत किती टक्के होते याचा अभ्यास केला पाहिजे.
आणखी विशेष की,सध्या थंडीचे दिवस सुरू असून सर्दी,खोकलाही या ऋतूतील देणगीच म्हणावी.आताच्या तिसऱ्या लाटेत जे खोकलत असतील ,ज्यांना सर्दी असेल त्यांनाही कोरोना रुग्ण म्हणावे काय हा सुद्धा प्रश्न आहे.
कोरोनाच्या पहिल्या व गेल्या वेळेच्या दुसऱ्या लाटेने लोकांना बरेच काही शिकविले आहे.लोकांनी आपले मार्ग बदलले ,जीवनशैली सुद्धा बदलली आहे.त्यातून काही अनुभव प्राप्त करून नवजीवन सुरू केलेले असतांना अर्थात लोक मग त्यांनी कोरोना प्रतिबंधक चे दोन डोस घेऊन आपली प्रतिकार शक्ती वाढविलेली असतांना कोणाच्या मनात आता भीती उरलेली नसावी .म्हणूनच “कोरोना“पर अब“क्यो रोना “असे लोक म्हणत आहेत.कोरोनाची पहिली लाट झाली,दुसरी सरली,तिसरी सुरू असतांना चौथ्या लाटेच्या वार्ता सुरू आहेत.याप्रमाणे
कोरोनाच्या लाटा वर लाटा येतच राहतील .“कोरोना “पॉझिटिव्ह आहे पण “लक्षणे नाहीत“हा किंवा असा प्रकार लोकांचा धीटपणाचा अर्क आहे.कोरोनाला आता लोक घाबरणारे नाहीत परंतुं प्रशासनाने लक्षणे नसलेल्यांना कोरोना रुग्णसंख्येत मोजू नये व घाबरविणारी आकडेवारी सांगू नये ही लोकांची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here