मुक्ताईनगर ः प्रतिनिधी
शहरासह तालुक्यात वाळूची वाहतूक आतापर्यंत रात्रीच्या वेळेस सुरू होती परंतु गेल्या आठ दिवसापासून वाळू माफिया सर्रासपणे दिवसाढवळ्या अवैधरित्या वाळूची वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे. १२ जानेवारी रोजी मुक्ताईनगर शहरात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६ या महामार्गावर बोदवड चौफुलीजवळ दुपारी बारा वाजता ट्रॅक्टर नादुरुस्त अवस्थेत बंद पडलेले होतेे.याविषयी स्थानिक पत्रकारांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदार श्वेता संचेती यांना शहरात होत असलेल्या दिवसाढवळ्या अवैध वाळू वाहतूक माहिती देत नादुरुस्त बंद पडलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरचा फोटो दाखवला व तात्काळ त्या ठिकाणी जाऊन महसूल प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी केली परंतु मंगळवारी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कामांमध्ये ईव्हीएम मशीनचे प्रशिक्षण सुरू होते.या प्रशिक्षणात आमचे महसूलचे कर्मचारी सर्व व्यस्त असल्याने सदर ठिकाणी आत्ताच जाता येणार नाही असे तहसीलदार संचेती यांनी सांगितले
मंगळवारी महसूल प्रशासनाने तात्काळ कारवाईसाठी महसूल कर्मचारी पाठवले असते तर अवैधरीत्या वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले असते व सव्वा लाखाचा दंड महसूलला मिळाला असता परंतु मंगळवारी तहसीलदारांनी महसूलला मिळणार्या सव्वा लाखाच्या दंडाच्या रकमेवर पाणी फिरले यावरुन महसूल प्रशासनाची हलगर्जीपणा उघड झाला आहे.
मुक्ताईनगर येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार यांनी बर्याच वेळा रात्री-अपरात्री तसेच पहाटेच्या सुमारास स्वतःच्या खाजगी वाहनातून संपूर्ण तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणार्यांवर करडी नजर ठेवून हजारो ट्रॅक्टरपैकी एक ट्रॅक्टर दिसले असता त्यावर कडक कारवाई करून आपल्या कर्तव्यदक्ष पणाचा धडाका दाखवला होता परंतु सर्व पत्रकारांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर नॅशनल हायवे नंबर ६ च्या रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या अवस्थेत दाखवले असता कर्तव्यदक्ष तहसीलदार यांनी कुठल्याच प्रकारची पाहणी न करता आम्ही आज कारवाई करू शकत नाही यावरून तहसीलच्या तिजोरीत पडणार्या सव्वा लाखाचा दंड तहसीलदारांनी बुडवला असेही स्पष्ट होत आहे.
रात्री-अपरात्री फक्त ट्रॅक्टर पकडले जात असून कारवाईचा देखावा केला जातो मात्र ज्या ठिकाणी रेतीचा उगम आहे व उपसा तसेच ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध केला जातो त्या ठिकाणी का कारवाई होत नाही,ती जागा कारवाईपासून का वंचित आहे,असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. या प्रकरणी शंका निर्माण होत असून ‘अर्थ’ पूर्ण व्यवहाराची साशंकता व्यक्त केली जात आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूकदारांना प्रशासन अभय देण्याचे काम तर करत नाही ना,अशी शंका व्यक्त केली जात आहे.कारवाई करणारी पथके नाममात्र ठरत आहे.