जळगाव प्रतिनिधी | शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ व्यापारी अनिल ओमप्रकाश मंधान यांच्या कारमधून तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी हातचलाखीने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गाडीचा पाठलाग करत ऑइल लीक होत असल्याचे खोटे सांगून चोरट्यांनी ही चोरी केली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल मंधान हे गणपती नगर येथील रहिवासी असून कृषी उत्पन्न बाजार समितीत फळ व्यवसाय करतात. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते आपल्या कारने घरी निघाले होते. याचवेळी आधीपासून त्यांच्या कारवर पाळत ठेवून असलेल्या पाच संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. गणपती नगर परिसरात पोहोचल्यानंतर चोरट्यांनी कार थांबवून गाडीतून धूर निघत असून ऑइल लीक होत असल्याची बतावणी केली.
गाडीत बिघाड झाल्याचा संशय आल्याने मंधान हे तातडीने कारमधून खाली उतरून वाहनाची पाहणी करू लागले. त्याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कारच्या मागील सीटवर ठेवलेली १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेली. काही क्षणातच हा प्रकार लक्षात आला, मात्र तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.
घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून ते कोणत्या वाहनाने आले आणि कोणत्या दिशेने पसार झाले, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
