साईमत न्यूज नेटवर्क –
बहारामपूर : पश्चिम बंगालमधील बहारामपूर येथे शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या व्हॅनला पॅसेंजर रेल्वेने जोरदार धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून आठ जण किरकोळ जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
ही दुर्घटना सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास बहारामपूर परिसरातील कर्णसुबर्णा रेल्वे फाटकाजवळ घडली. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन रेल्वे रुळ ओलांडत असताना निमटिता–कटवा पॅसेंजर ट्रेनने तिला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की व्हॅनचा अक्षरशः चुराडा झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी कर्णसुबर्णा रेल्वे फाटक खुले होते. त्यामुळे स्कूल व्हॅनसह एक सायकलस्वारही रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी वेगाने आलेल्या पॅसेंजर रेल्वेने व्हॅनला धडक दिली आणि काही क्षणांतच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून बहारामपूर येथील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
या दुर्घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हावड्याकडे जाणारी नवद्वीप एक्सप्रेस गेल्यानंतरही गोबिंदपूर रेल्वे फाटक खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे वाहनचालकांनी रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि हा भीषण अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत पूर्व रेल्वे प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी विशेष पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले असून चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
