साईमत / जळगांव
जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. गुरुवारी (१६ एप्रिल) मोसमातील सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र ही परिस्थिती अजून तीव्र होण्याची शक्यता असून पुढील ४८ तास अधिक कठीण ठरणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार १७ आणि १८ एप्रिल रोजी तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उष्णतेची ही लाट पुढील काही दिवसांनंतर हवामानातील बदलांसोबत कमी होण्याची शक्यता आहे. १९ एप्रिलपासून ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २० ते २३ एप्रिलदरम्यान ढगाळ वातावरण राहून अधूनमधून वादळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होऊन नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळू शकतो.
तथापि, हा दिलासा अल्पकालीन ठरण्याची शक्यता असून २५ एप्रिलपासून पुन्हा एकदा उष्णतेची लाट सक्रिय होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या कोरड्या हवामानामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून दुपारच्या वेळेत शहरातील रस्तेही ओस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे खान्देशात तापमानाचा पारा सातत्याने चढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज: १७ एप्रिल : ४४°C – उष्णतेची लाट (यलो अलर्ट), १८ एप्रिल : ४४°C – उष्णतेची लाट (यलो अलर्ट), १९ एप्रिल : ४१°C – दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस, २० एप्रिल : ३९°C – ढगाळ वातावरण, वादळी पाऊस, २१ एप्रिल : ३९°C – ढगाळ वातावरण, वादळी पावसाची शक्यता
