जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीच्या बैठकीत सविस्तर आढावा; पारदर्शक वितरणावर भर
साईमत जळगाव प्रतिनिधी
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रोहन घुगे होते.
बैठकीत जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा, वितरण व्यवस्था सुरळीत राहावी आणि कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये, याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. कृषी आयुक्तालयाकडून जिल्ह्याला मागणीपेक्षा अधिक खत पुरवठ्याचा कोटा मंजूर झाल्याची माहिती कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी सादर केली. त्यांनी जिल्ह्यातील खत पुरवठा नियोजन, साठा व्यवस्थापन आणि वितरण यंत्रणेची सविस्तर माहिती दिली.
या वेळी प्रशासनाने शेतकऱ्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच अनावश्यक खत साठवणूक टाळण्याचे आवाहन केले. जमिनीच्या आरोग्यपत्रिकेनुसार आणि पिकांच्या गरजेनुसारच खत खरेदी करावी, असेही स्पष्ट करण्यात आले.
खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व विक्रेत्यांना आधार लिंकिंग (e-POS) प्रणालीद्वारेच खत विक्री करणे तसेच अचूक बिलिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
खरीप हंगामात खतांचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी कृषी विभाग, पोलीस प्रशासन, रेल्वे विभाग, वाहतूकदार तसेच शेतकरी संघटनांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
दरम्यान, खरीप हंगामात शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगण्यात आले. खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण प्रक्रियेवर काटेकोर लक्ष ठेवले जाणार आहे. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त निविष्ठा वाटपाला प्राधान्य दिले जाईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
