‘सुंदर जळगाव’साठी भव्य पुतळा, महापालिकेकडे निवेदन सादर
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा स्वामी समर्थ चौकात उभारावा, अशी मागणी रामेश्वर कॉलनी विकास फाउंडेशन आणि मेहरूण परिसरातील नागरिकांनी महापौर दिपमाला काळे यांच्याकडे केली आहे. सोमवारी, ६ एप्रिल रोजी या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून, आगामी महापालिका महासभेत ठराव मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, मेहरूण परिसरातील अशोक किराणा ते जकात सोसायटी आणि श्रीकृष्ण मेडिकल ते मंगलपुरी या मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या स्वामी समर्थ चौकात हा पुतळा उभारला जावा. या परिसरात सर्व जाती-धर्माचे नागरिक शांततेत राहतात, आणि छत्रपती संभाजी महाराजांचे धाडस, आदर्श विचार तसेच महिलांविषयी उच्च मूल्यांची शिकवण भविष्यातील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे नागरिकांचे मत आहे.
फाउंडेशनने स्पष्ट केले आहे की, प्रस्तावित पुतळ्यामुळे परिसरातील वाहतूक किंवा रहदारीला कोणताही अडथळा येणार नाही; उलट, यामुळे ‘सुंदर जळगाव’ या संकल्पनेला अधिक बळकटी मिळेल. नागरिकांनी महापालिकेकडून जागा मंजूर करणे आणि पुतळा उभारणीसाठी निधी उपलब्ध करण्याची तातडीची मागणी केली आहे.
रामेश्वर कॉलनीतील निवेदनावर असंख्य रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या असून, नगरसेवक गणेश सोनवणे, राजेंद्र घुगे पाटील, दिपक मांडाळे, संजय सपकाळे, ज्ञानेश्वर पाटील, नंदु पुराणिक, संदिप मांडोळे, संजय जगताप, विशाल पाटील, सचिन वाघ, ॲड. ललित तेली, उमेश खोंबटे, चेतन शिंपी, यशवंत सपकाळे, सागर इंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या देखील आहेत.
सदर निवेदनावर महापालिकेची कारवाई कधी होईल, याकडे संपूर्ण मेहरूण परिसराचे लक्ष लागले असून, नागरिकांना त्यांच्या स्वराज्यरक्षक छत्रपतींच्या गौरवासाठी या प्रकल्पाची प्रतीक्षा आहे.
