साईमत / जळगाव
जिल्ह्यातील हवामानात एप्रिलमध्ये अनपेक्षित बदल झाला आहे. कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर अचानक पाऊस आणि दमट हवामान निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य डळमळीत झाले आहे. त्याचा थेट परिणाम रुग्णसंख्येवर दिसून येत असून शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णालये पूर्णपणे हाऊसफुल्ल झालेली आहेत.
सध्या ताप, सर्दी, खोकला, उलट्या-जुलाब, अंगदुखी, त्वचारोग आणि श्वसनासंबंधी तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आर्द्रतेमुळे विषाणू आणि जीवाणूंना पोषक वातावरण मिळाले असून संसर्गजन्य आजारांचा फैलाव जलद होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रुग्णांची गर्दी वाढली असून औषधांचा तुटवडा आणि डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे.
आरोग्य विभागाने गावोगावी आरोग्य शिबिरे आणि जनजागृती मोहिमा राबवल्या आहेत. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, उकळलेले पाणी पिणे, अन्न स्वच्छ आणि ताजे खाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शाळांमध्येही विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहावे. प्रशासनास साचलेल्या पाण्यावरील नियंत्रण आणि आरोग्य यंत्रणेची क्षमता वाढवणे आवश्यक आहे. जळगावकरांनी सावध राहणे, स्वच्छ राहणे आणि आजारी पडल्यास त्वरित उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
