“ऊर्जा वाचवा, भविष्य घडवा” विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
साईमत /जळगाव / प्रतिनिधी:
वाढत्या वीज वापरामुळे निर्माण होत असलेल्या ऊर्जा तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांमध्ये ऊर्जा बचतीचे महत्त्व रुजवण्यासाठी प्रविण पाटील फाउंडेशनतर्फे जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात प्रविण पाटील यांनी विद्यार्थ्यांना ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व सविस्तरपणे पटवून दिले.
प्रविण पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात ऊर्जा ही केवळ सुविधा नसून देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याचे अधोरेखित केले. औद्योगिक विकास, शेती, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्षेत्र ऊर्जा वापरावर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, वाढती लोकसंख्या आणि आधुनिक उपकरणांच्या वापरामुळे वीजेची मागणी झपाट्याने वाढत असून, ऊर्जा बचत करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
“ऊर्जा निर्माण करण्यापेक्षा ऊर्जा वाचवणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी भविष्यातील संभाव्य ऊर्जा संकटाचा इशाराही दिला. वेळेत उपाययोजना न केल्यास गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
ऊर्जा बचतीसाठी त्यांनी विविध उपाय सुचवले. घरामध्ये एलईडी बल्ब व ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर, वापरात नसताना इलेक्ट्रॉनिक साधने बंद ठेवणे, नैसर्गिक प्रकाशाचा अधिक वापर, सौरऊर्जेचा अवलंब आणि शाळा-कार्यालयांमध्ये ऊर्जा बचतीचे नियम काटेकोरपणे पाळणे या उपायांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. तसेच ग्रामीण भागात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना त्यांनी सांगितले की, “आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. त्यांनी लहानपणापासून ऊर्जा बचतीची सवय लावली, तर समाजात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो.” विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही ऊर्जा बचतीबाबत जागरूक करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना ऊर्जा बचतीचे प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले. काही ठिकाणी ऊर्जा संवर्धनामुळे झालेल्या सकारात्मक बदलांची उदाहरणेही सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी “ऊर्जा वाचवा, पर्यावरण वाचवा” या घोषवाक्याखाली सर्व उपस्थितांनी ऊर्जा बचतीची शपथ घेतली.
