“जर तात्काळ घंटागाडी सुरू झाली नाही, तर स्वखर्चाने कचरा उचलून तो आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर फेकू.”
साईमत जळगाव प्रतिनिधी:
महापालिका निवडणुकीनंतर पार पडलेल्या पहिल्या महासभेत आज सोमवार, ३० मार्च रोजी सकाळी ११ वाजता शहरभर गाजलेली वादळी चर्चा रंगली. आरोग्य, स्वच्छता, कचरा संकलन आणि पाणीपुरवठा या मूलभूत प्रशासकीय प्रश्नांवरून सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. विशेषतः कचरा संकलनातील भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर सभागृहात तीव्र टीका झाली.
सभेचे अध्यक्षस्थानी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि नगरसचिव सतीश शुक्ला उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन लढ्ढा, नितीन बरडे आणि माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी प्रशासकीय कामकाजातील रखडलेल्या मुद्द्यांची यादी वाचून उपस्थितांचे लक्ष वेधले.
कचरा संकलनातील घोटाळा : ‘मातीचा खेळ’
सभेतील सर्वात खळबळजनक मुद्दा कचरा संकलन ठरला. शहरातील ‘बीव्हीजी’ या कचरा संकलन करणाऱ्या मक्तेदाराकडून ट्रॅक्टरमध्ये कचऱ्याऐवजी माती भरून वजन वाढवले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. उपमहापौर आणि नगरसेवकांनी १२५ फोटो आणि व्हिडिओ पुराव्यासह थेट उपायुक्तांच्या मोबाईलवर सादर केले. कचरा मोजणीच्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा दावा करत संबंधित मक्तेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याची दखल घेत आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
अधिकाऱ्यांची निष्क्रियता : आंदोलनाचा इशारा
समता नगर परिसरात घंटागाडीच्या अभावामुळे नागरिक त्रस्त असल्याचे मुद्दे उपस्थित केले. या प्रकरणात नितीन बरडे यांनी जोरदार शब्दांत इशारा दिला की, “जर तात्काळ घंटागाडी सुरू झाली नाही, तर स्वखर्चाने कचरा उचलून तो आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर फेकू.”
त्याचबरोबर माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी जळगाव-भुसावळ रोडवरील स्वामीनारायण मंदिर परिसरातील पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. अनेकवेळा पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने त्यांची नाराजी उंचावली. सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती झाली.
एकूणच, नवनिर्वाचित महापालिकेची पहिली महासभा प्रशासकीय दिरंगाई, भ्रष्टाचार आणि मूलभूत सेवांवरील प्रश्नांमुळे गाजली असून, आगामी काळात अधिकारी व सत्ताधारी यांच्यात संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे.
