२२ टन कचरा हटवून महापौरांचा विक्रेत्यांना कडक इशारा
साईमत जळगाव प्रतिनिधी:
शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून सुरू असलेल्या विशेष स्वच्छता अभियानांतर्गत रविवारी (२९ मार्च) गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करत या मोहिमेला नेतृत्व दिल्याने प्रशासनासोबतच नागरिकांमध्येही मोठी जनजागृती निर्माण झाली.
गोलाणी मार्केटमधील स्वच्छतेचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित होता. गाळेधारकांनी न्यायालयीन दाद घेतल्यामुळे स्वच्छतेच्या कामात अडथळे निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत महापौरांनी विशेष स्वच्छता मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावत, “स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून दुकानदारांनीही स्वतःच्या दुकानासमोरील परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे,” असे सांगितले.
या मोहिमेत सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ४५३ बीव्हीजी कामगार सहभागी झाले होते. ५ ट्रॅक्टर, ३ पिकअप आणि १ डंपरच्या सहाय्याने मार्केट परिसरातील साचलेला कचरा हटविण्यात आला. या धडक कारवाईत तब्बल २२ टन कचरा संकलित करण्यात आल्याने परिसरात मोठा दिलासा मिळाला.
अभियानादरम्यान महापौरांनी फळ विक्रेत्यांची पाहणी करत अस्वच्छता करणाऱ्यांवर थेट कारवाई केली. खराब फळे, गवत व कागदी कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या विक्रेत्यांना तो कचरा स्वतः उचलून कचराकुंडीत टाकण्यास भाग पाडण्यात आले. तसेच प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाई करत पिशव्या जप्त करण्यात आल्या. पुढील दोन दिवसांत प्लास्टिकचा वापर सुरू ठेवल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा कडक इशाराही महापौरांनी दिला.
या मोहिमेत स्थानिक नगरसेवक तथा माजी महापौर व शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, स्वच्छता अधिकारी अनिल कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, रुपेश भालेराव, मुकेश पाटील, समाधान निकम, मयूर सपकाळे, प्रदीप धापसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वच्छता कर्मचारी आणि स्थानिक व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महापौर दीपमाला काळे यांनी यावेळी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “दुकानदारांनी आपल्या दुकानाबाहेर कचराकुंडी ठेवावी, ग्राहकांना कचरा न टाकण्याबाबत जागरूक करावे आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून बायोडिग्रेडेबल किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा. स्वच्छता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.”
