रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली; संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात, नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील जैनाबाद परिसरात अत्यंत किरकोळ कारणावरून घडलेल्या खूनाच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. केवळ ५०० रुपयांच्या वादातून झालेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नितीन नाना काळे (वय ३५) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी श्याम तुकाराम सूर्यवंशी याने नितीन काळे याच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली होती. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. संतापाच्या भरात आरोपीने धारदार शस्त्राने नितीनवर अनेक वार केले. हे वार इतके भीषण होते की त्यामध्ये नितीन काळे यांचे आतडे बाहेर येण्याइतकी गंभीर जखम झाली होती.
घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत नितीन काळे यांना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमला. परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये म्हणून पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त तैनात केला.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित श्याम सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वी देखील संशयिताने नितीन काळे याच्याशी वाद घालत त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली होती. मात्र, त्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला केवळ दोन दिवसांत सोडून दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच, पैसे घेऊन आरोपीला मोकळे सोडण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
मयताचा भाऊ राजू काळे आणि नातेवाईक जितेंद्र सोनवणे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या धक्कादायक घटनेमुळे “केवळ काही रुपयांसाठी जीव घेण्यापर्यंत परिस्थिती कशी पोहोचते?” असा संतप्त सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत असून, कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
