साईमत / मुंबई / प्रतिनिधी
मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून बांधकामासाठी खोदलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बांधकाम स्थळांवरील सुरक्षा उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दिव्यांश राजेश मौर्य (वय ८) असे मृत मुलाचे नाव आहे. तो आंबेवाडीतील चगन पटेल चाळीत राहात होता. घराबाहेर खेळत असताना त्याचा चेंडू जवळच सुरू असलेल्या बांधकामाच्या खड्ड्यात गेला. हा खड्डा पाण्याने भरलेला असल्याने चेंडू काढण्यासाठी गेलेल्या दिव्यांशचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला.
घटनेची माहिती मिळताच कुरार व्हिलेज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मुलाला बाहेर काढून तातडीने कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, संबंधित खड्डा मौली कन्स्ट्रक्शन कंपनीने खोदल्याची माहिती समोर आली आहे. बांधकामस्थळी योग्य सुरक्षा उपाययोजना करण्यात निष्काळजीपणा झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी बांधकाम स्थळांवर कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
