साईमत / मुंबई / प्रतिनिधी
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जळगावसह राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून राज्यात अद्यापही अवकाळी पावसाचे सावट कायम आहे.
भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाडा भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. गुरुवारी वाशीम येथे ३८.४ अंश, जळगाव येथे ३७ अंश आणि अकोला येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली, तर धुळे येथे नीचांकी १५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
खान्देशात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी पावसाने हजेरी लावली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात गारपीट झाली, तर नंदुरबारातील धडगाव तालुक्यात सातपुडा परिसरातील अनेक गावांमध्ये रात्री जोरदार पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला.
या अवकाळी पावसामुळे ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा यांसह लिंबू आणि केळी बागांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या उरलेल्या आशांनाही मोठा धक्का बसला आहे.
