शेतकऱ्यांचा नगरपालिकेकडे बैलांचा मोर्चा काढण्याचा इशारा
साईमत/यावल/ प्रतिनिधी
शहरातील मोकाट गुरे व सांड यांचा अतिक्रमण वाढत चालल्याने शेतकऱ्यांची मनस्तापाची पातळी गाठली आहे. यावल शहरातील शेतकरी संघटनेने नगरपालिकेला ८ दिवसांत मोकाट गुरांचा बंदोबस्त न केल्यास, नगरपालिकेवर बैलांचा मोर्चा काढण्यात येईल, असे लेखी निवेदन तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यावल यांना दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, यावल शहरात मोकाट गुरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यात सांडही समाविष्ट आहेत. हे जनावर रस्त्यावर फिरताना येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांसाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत. मोकाट सांडांमुळे यापूर्वीच एका व्यक्तीचा जीव गेला आहे, अशी माहिती निवेदनात दिली आहे. शेतकऱ्यांचा इशारा आहे की, या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात आणखी मोठा अपघात होऊ शकतो.
शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी असलेल्या निवेदनावर निलेश गडे, समाधान वाघ, गणेश सुरळकर, युवराज कोळी, दीपक वाघ, हर्षल कोळी, समीर खान, अयाज खान, मनोज पाटील आणि बापू कोलते यांचा समावेश आहे.
यावल नगरपालिकेने या समस्येवर तातडीने कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शहरातील मोकाट गुरांवर योग्य बंदोबस्त न केल्यास शेतकऱ्यांचा बैलांचा मोर्चा शहरात निघणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
या घटनेने स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून नागरिक आणि शेतकरी यांच्यातील जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.
