केवायसी बहाण्यावर शंभर ते तीनशे रुपये मागणी; महिलांचा संताप
साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी
शासनाच्या वतीने बांधकाम कामगार महिलांना गृह उपयोगी वस्तूंचा भांडी संच वाटप करण्यासाठी सुरू असलेल्या केंद्रावर आज संभ्रम आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या मागील गोडाऊनवर सुरू असलेल्या या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांनी ‘केवायसी अपडेट’ करण्याच्या बहाण्याखाली लाभार्थी महिलांकडून १०० ते ३०० रुपयांची बेकायदेशीर मागणी केल्याचे गंभीर आरोप महिलांनी केले आहेत.
सकाळपासूनच महिलांची मोठी गर्दी झाली होती. शहरासह परिसरातील शेकडो महिलांनी पहाटे ६ वाजेपासूनच आपला नंबर येण्याची प्रतीक्षा सुरू ठेवली होती. या गर्दीत वयोवृद्ध महिलांचा तसेच अंगावर लहान बाळे असलेल्या मातांचा समावेश होता. रणरणत्या उन्हात तासनतास उभ्या राहून वाट पाहणाऱ्या महिलांना ‘केवायसी अपडेट’च्या नावाखाली पैसे मागितल्याची माहिती समोर आली.
लाभार्थी महिलांच्या तक्रारींनुसार, “आम्ही हक्काच्या वस्तू घेण्यासाठी आलो होतो, पण कर्मचारी शंभर ते तीनशे रुपये मागत आहेत. ही रक्कम नेमकी कशासाठी आहे, याचे कोणतेही स्पष्टीकरण मिळत नाही,” असे महिलांनी सांगितले. दुसरीकडे, केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि “आम्ही कोणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत,” असे स्पष्ट केले.
प्रचंड गर्दी आणि वाहनांच्या व्यवस्थेअभावी वाटप केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महिलांची सुरक्षा आणि सुविधा यावर कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे दिसून आले. गरीब कष्टकरी महिलांकडून अशा प्रकारे पैसे मागितले जात असल्यास प्रशासनाने त्वरित सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी लाभार्थी व नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.
या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील वाटप कार्यक्रम अधिक सुव्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावा, अशी लोकांची अपेक्षा आहे.
