आदिवासी शालेय विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप, विविध योजनांचा लाभ
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य उभे करताना “रयतेचा राजा म्हणजे रयतेची सेवा” हा मूलमंत्र ठेवला होता. त्या तत्त्वावर चालत आज राज्य शासन नागरिकांच्या दारी पोहोचत असून, नागरिकांना थेट शासकीय सेवा मिळाव्यात, यासाठी “महाराजस्व समाधान शिबिर”चे आयोजन केले जात आहे. भोकर व आसोदा येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन करत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गोरगरिबांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा असल्याचे प्रतिपादन केले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, “एखाद्या गरीब आईला तिच्या मुलासाठी दाखला मिळणे, एखाद्या शेतकऱ्याचा जमीन प्रश्न सुटणे किंवा एखाद्या कुटुंबाला घरकुल मिळणे – या आनंदातून शासनाच्या कार्याचे खरे समाधान मिळते. आपल्या जीवनाचा उद्देशच लोकांची सेवा करणे आहे.”
ते पुढे म्हणाले की, पूर्वी नागरिकांना साध्या दाखल्यासाठीही तहसील, पंचायत समिती किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागायच्या. यामुळे वेळ, पैसा आणि त्रास होतो होता. आता शासनाने ठरवले आहे की “जनता शासनाच्या दारी उभी राहणार नाही, शासनच जनतेच्या दारी जाईल.” या संकल्पनेवरून महाराजस्व समाधान शिबिर राबवण्यात आले आहे. गेल्या वर्षांत जिल्ह्यात हजारो लाभार्थ्यांना सातबारा, उत्पन्न दाखले, घरकुल तसेच विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळाला आहे.
पालकमंत्री यांनी राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या निर्णयांचा उल्लेख करत सांगितले की, दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात आली असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की, शासनाच्या योजना कागदावर न राहता प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचवाव्यात. अधिकाऱ्यांनी लोकांशी संवेदनशीलतेने वागावे, कारण शासनाच्या टेबलापलीकडे एका कुटुंबाचे आयुष्य उभे असते, अशी जाणीव त्यांनी करून दिली.
शिबिरात विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. कृषी, महसूल, पशुसंवर्धन, भूमी अभिलेख, महिला बचत गट, आरोग्य विभाग यांसह अनेक योजनांचे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. आदिवासी शालेय विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप, रहिवास प्रमाणपत्र, डिजिटल ७/१२, अनु.जमाती जात प्रमाणपत्र, संजय गांधी व श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, दिव्यांग लाभार्थी योजना, जिवंत ७/१२ वारस नोंदी, पोटखराब प्रकरणे, उत्पन्न दाखले, रेशन कार्ड, फार्मर आयडी, आयुष्मान कार्ड अशा विविध योजनांचा लाभ देण्यात आला. आसोदा येथे ६१३ तर भोकर येथे ६७७ अशा एकूण १२९० लाभार्थ्यांना सेवा व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
असोदा येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित काव्यनाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ग्रामीण जीवन, कष्टकरी संस्कृती आणि जीवनमूल्ये विद्यार्थ्यांनी प्रभावी अभिनयातून सादर केली.
शिबिरात उपस्थित होते सरपंच प्रमिलाबाई सोनवणे, मंडळ अधिकारी आशिष वाघ, अजिंक्य आंधळे, बालाशेठ राठी, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, गोपालजी बाहू, डॉ. सत्वशील पाटील, भरत बोरसे, उप तालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, डॉ. कमलाकर पाटील, किशोर पाटील, पंकज पाटील, दत्तू आबा सोनवणे, किशन सोनवणे, छोटू सरकार, सुभाष बडगुजर, रमेश आप्पा पाटील, डॉ. दिलीप लाठी, तसेच सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्राजक्ता केदार व उपशिक्षक सुनील पाटील यांनी केले. तहसीलदार शीतल राजपूत यांनी आभार मानले.
या शिबिरातून शासनाचे उद्दिष्ट स्पष्ट झाले – लोकांची सेवा हीच सर्वोच्च धर्म आणि शासनाचे खरे काम म्हणजे नागरिकांच्या जीवनात बदल घडवणे.
