काळाचा घाला भीषण अपघातात तिघे जागीच ठार, तीन जखमी
साईमत/मालेगाव/प्रतिनिधी
होळीच्या सणाच्या आनंदाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड गावातील नाफडे कुटुंबावर शुक्रवारी सकाळी ६ मार्च रोजी काळाचा भीषण घाला आला. मालेगाव परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सातोड गाव हळहळेत बुडाले आहे.
होळीच्या सणासाठी परतीच्या प्रवासात अपघात
सातोड येथील नाफडे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी नाशिक येथे वास्तव्यास आहे. होळीच्या सणानिमित्त कुलदैवताचे दर्शन घेऊन ते नाशिकहून आपल्या मूळ गावी सातोडकडे खाजगी वाहनाने प्रवास करत होते. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मालेगाव परिसरात त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. अपघात इतका भयंकर होता की गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
मृतक आणि जखमींची माहिती
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये दीपक किशोर नाफडे (वय ३५), प्रथमेश दीपक नाफडे (वय ४) आणि अंकिता संजय नाफडे (वय १९) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये संजय पांडुरंग नाफडे (वय ५०), चारुलता संजय नाफडे आणि पूजा दीपक नाफडे (वय ३०) यांचा समावेश असून त्यांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.
गावात शोककळा पसरली
घटनेची माहिती मिळताच सातोड गावाचे पोलीस पाटील आणि ग्रामस्थ त्वरित मालेगावकडे धाव घेऊन गेले. आपल्या हक्काच्या माणसांना सण साजरा करण्यासाठी येताना अशा प्रकारे मृत्यूने गाठावे, अशी कल्पना गावकऱ्यांसाठी दु:खदायक ठरली. मृतांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी सातोड गावी आणण्यात येत असून संपूर्ण परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण पसरले आहे.
