गंभीर परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक महिलांनी महापौरांकडे निवेदन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
राजमालती नगरातील वाढीव वस्तीतील रहिवासी येत्या काही दिवसांत ये-जा करण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होण्याची शक्यता असल्याने चिंतेत आहेत. या गंभीर परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक महिलांनी मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी महापौर दीपमाला काळे यांना निवेदन सादर करून पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
दूध फेडरेशनजवळील गट क्रमांक ३२०/१ब/१ आणि ३२०/१ब/२ परिसरातील रहिवासी अनेक वर्षांपासून खासगी जागेतून ये-जा करत होते. हा मार्ग त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एकमेव आधार आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी महानगरपालिकेतर्फे या भागात डांबरीकरण करण्यात आले. संबंधित जागा मालकाने या जागेवर कंपाउंड उभारल्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे.
जागा मालकाशी संवाद साधल्यानंतरही नागरिकांना फक्त पंधरा दिवसांची तात्पुरती सोय मिळाली असून, नंतर हा मार्ग पूर्णपणे बंद होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आपत्कालीन सेवांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मार्गाचा उपयोग भविष्यात होणार नाही, असा परिसरातील नागरिकांचा संताप आहे.
निवेदनात, महिलांनी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे तसेच मार्गावरील डीपी (विद्युत वितरण यंत्रणा) हटवण्याची मागणी केली आहे, कारण विद्युतीय यंत्रणेमुळे रस्ता निर्माण करण्यास अडथळा निर्माण होत आहे.
महिलांनी मनिषा पारेराव, कुसुमबाई वानखेडे, उषा ब्राम्हणे, संघमित्रा मेढे, अरुणाबाई बनसोडे, कमलाबाई परदेशी, बबीताबाई सोनवणे, पुनम कदम, वैशाली अहिरे आणि मेहमुदाबाई शेख यांच्या नेतृत्वाखाली महापौरांकडे निवेदन सादर केले. नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे.
